Pawana Dam: पवना धरणात केवळ १९% साठा! ३१ ऑगस्टपर्यंत सिंचनाचा उपसा पूर्णपणे बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
Pawana Dam: खडकवासला पाटबंधारे विभागाचा मोठा निर्णय; धरण, नदी आणि कालव्यातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.

Pawana Dam – पवना धरण क्षेत्रात निर्माण झालेल्या एल-निनो सदृश परिस्थितीमुळे संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पवना धरणातील उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य देण्यात आले असून सिंचनासाठी होणारा पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत पवना धरण शाखेकडून याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पवना धरण परिसरातील नागरिक, शेतकरी, लाभधारक, व्यावसायिक तसेच विविध मिळकतधारकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळून जपून आणि नियोजनपूर्वक वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या १३ जून २०२६च्या शासन पत्रानुसार सिंचनासाठी होणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धरण, नदी, कालवा, तलाव तसेच इतर जलस्रोतांमधून कोणत्याही प्रकारे अनधिकृत किंवा बेकायदेशीर पाणी उपसा केल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी चोरी किंवा अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे.
तालुक्यातील शेती, उद्योग आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि सर्व संबंधित घटकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाणी बचतीचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी वाचवा – भविष्य वाचवा हा संदेश देत जलसंपदा विभागाने प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याची जाणीव नागरिकांना करून दिली आहे.
“धरणात सध्या १९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी अत्यंत जपून वापरावे.”
– रजनीश बारिया, अभियंता, पवना धरण शाखा





