पुणे – करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढील तीन महिने गंभीर आजार होण्याचा धोका असतो. अशा आजारांबाबत लक्षणे दिसल्यास या रुग्णांनी तातडीने उपचारासाठी यावे, यासाठी महापालिकेने जंबो कोविड हॉस्पिटलसह तीन ठिकाणी “पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. मात्र, या उपक्रमास रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांनी सुरू केलेल्या अशा “ओपीडी’मध्ये मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. तर पालिकेचा हा उपक्रम मोफत असतानाही रुग्ण त्याकडे पाठ फिरवत आहेत.
करोनातून बरे झाल्यानंतर काही काळापर्यंत (साधारणपणे 6 ते 10 आठवडे) सौम्य किंवा तीव्र लक्षणे असलेल्या तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांना अंगदुखी, थकवा, नैराश्य, पक्षाघात, त्वचेवर पुरळ, हृदय विकाराचा झटका असे आजार होऊ शकतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर गंभीर आजार असलेल्यांना अधिक धोका असतो. त्यामुळे करोनामुक्त नागरिकांनी यापैकी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, यासाठी महापालिकेनेही “पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू केल्या आहेत.
येथे तज्ज्ञ डॉक्टर, फिजिओथेरेपिस्ट मोफत मार्गदर्शन करतात आणि पुढील उपचार निश्चित करणार आहेत. त्यासाठी शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल, बाणेर येथील महापालिकेचे कोविड हॉस्पिटल, तसेच डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात या “ओपीडी’ सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरात अत्यल्प रुग्णांनी या “ओपीडी’ला भेट दिल्याचे समोर आले आहे.
दुर्लक्ष पडतेय महागात
सध्या करोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक असली, तरी त्यानंतर त्रास होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असून अनेकांना गंभीर आजार झाले आहेत. घरी सोडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन न करणे, आहार, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे, घरी सोडल्यानंतर प्रत्येक दोन आठवड्यांनी रुग्णालयात जाऊन नियमित तपासणीकडे रुग्ण दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तसेच पोस्ट कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.