आ. शंभूराज देसाई यांचा प्रचार दौऱ्यात आरोप
सणबूर – पाटण विधानसभा मतदारसंघातील मोरणा विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पाटण तालुक्यात प्रदीर्घ काळ सत्ता असलेल्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी विरोधकांचा बालेकिल्ला म्हणून हा विभाग विकासापासून दुर्लक्षित ठेवला असल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला.
मोरणा विभागातील नेरळे, आंबेघर तर्फ मरळी, गोकुळ, दीक्षी, धावडे, कोकीसरे, पेठ शिवापूर, आंब्रग, नाटोशी, कुसरूंड, कदमवाडी, सोनवडे व चोपदारवाडी या गावामध्ये महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदु, बशीर खोंदु उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, या विभागातील नंदनवन असलेले मोरणा गुरेघर धरणाच्या कामास युतीच्या काळात गतीने सुरवात करण्यात आली. त्याचबरोबर कालव्याच्या पाण्याचा येथील शेतकरी यांना फायदा व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात आला आहे.
मोरणा विभागातील जनतेला भेडसावणाऱ्या वाडीकोतावडे येथील मोरणा नदीवरील पूल जोडून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, विक्रमसिंह पाटणकर यांना आघाडी सरकारच्या काळात याठिकाणी साधा पूल जोडण्याचे काम करता आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी आप-आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे. विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. विरोधक निवडणूक आली की त्यांना गावांची नावे आठवतात पण ती गावे कुठे आहेत हे त्यांना आठवत नाहीत असा खोचक टोलाही त्यांनी मारला.
देसाई पुढे म्हणाले, राज्यात महायुतीच्या काळात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. त्यामुळे युतीच्या सरकारमधील आमदार म्हणून या विभागात कोट्यवधींचा निधी आणता आला. या विभागात विकासकामे करुन विकासाचा अनुशेष भरून काढण्यास मदत झाली आहे. एकूण 1806 कोटी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघात आला तो कारखान्यावर किंवा साताऱ्यात बसून आला नाही याकरीता शासनदरबारी मला प्रयत्न करावे लागले आहेत. त्यामुळे कधीही न होणारी अनेक कामे या पाच वर्षाच्या कालावधीत मार्गी लागली असल्याचे ते म्हणाले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देवून पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास आणखीन गतीने करण्याकरीता मला पाठबळ द्यावे. तसेच महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनाही माझ्याबरोबरीने प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन शंभूराज देसाई यांनी या प्रचारदौऱ्यात केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू म्हणाले, शंभूराज देसाई हेच खऱ्याअर्थाने पाटण तालुक्याचे विधाते आहेत. त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत कोट्यावधीची विकासकामे करून तालुक्याचा कायापालट केला आहे. भविष्यात पाटणचा आणखी विकास करण्यासाठी शंभूराज देसाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपले अनमोल मत देवून निवडून द्यावे, असे आवाहन केले.