Patan News – पाटण तालुक्यातील नावडी नवीन वसाहतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, शाखा अभियंता सलीम मुल्ला यांनी या कामाची पाहणी केली. तेथील रहिवाशांना योजनेच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या योजनेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. योजनेच्या उद्घाटनानंतर घरोघरी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. नावडी वसाहतीत नावीन्यपूर्ण नळपाणी पुरवठा योजना व्हावी, अशी मागणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री देसाई यांनी जलजीवन मिशन अंतर्गत दीड कोटीची योजना मंजूर केली. या योजनेत नळ जोडणीचे काम झाले आहे. योजना कार्यान्वित करण्यापूर्वी उपअभियंता प्रतीक भाट यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सलीम मुल्ला, पांडुरंग नलवडे, ठेकेदार महेश पवार, सरपंच लक्ष्मीबाई पुजारी, उपसरपंच संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्या शोभा मस्के, संध्याराणी पवार यांनी योजनेची पाहणी केली. योजनेची चाचणीही घेण्यात आली. सर्व वॉर्डांमध्ये प्रत्येक नळाला पाणी पोेहोचले असल्याची खात्री करण्यात आली. एटीएमद्वारेही पाण्याची सोय करण्यात आली आहे. जलजीवन योजनेचा लेखाजोखा -योजनेसाठी एक कोटी 20 लाख रुपये खर्च -कोयना नदीवर इनटेक कॅप्सुल बसवली -साडेसात अश्वशक्तीच्या पंपाने पाणी उचलले -मोठ्या पाईपद्वारे एक किलोमीटरवर फिल्टर हाऊसमध्ये पाण्याचा पुरवठा -फिल्टर हाऊसमध्ये दर तासाला 30 हजार लिटर पाणी फिल्टर -गावांतर्गत 7 किलोमीटर वितरण नलिकांद्वारे पुरवठा