पिंपरी,(वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश पीएमपी मार्गावर बस थांबे नाहीत. सध्या उन्हाळा सुरू आहे. घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा उन्हातान्हात शहरातील पीएमपी प्रवाशांना बसची वाट पाहत उभा राहवे लागत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुख्य रस्त्यांवर जेथे बस थांबा उघडा आहे तेथे नवीन बस थांबा उभारावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली आहे. परंतु अद्यापही पीएमपीची प्रवासी संख्या कमी झालेली नाही. बहुतांश नागरिकांना सध्या तरी प्रवासासाठी पीएमपी महत्त्वाचे साधन वाटत आहे. त्यामुळे शहरातील पीएमपी बस ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवडमधील काही भागांमध्ये बस थांबा दिसत नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत भर उन्हात थांबावे लागत आहे.
यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामध्ये बसच्या फेर्यादेखील अनियमित आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. शाळकरी मुले, अपंग-दिव्यांग बांधव, आजारी माणसे, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षापासून बसथांबे उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. अद्याप बसथांबे बांधले गेले नाहीत. काही ठिकाणी बसच्या फेर्यादेखील नियमित नाहीत. त्यामुळे बस ही प्रवाशांच्या सेवेसाठी की, त्यांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, शाहूनगर, नेहरूनगर, जाधववाडी वडाचा मळा, नाशिक फाटा, मोरवाडी मेट्रो, मासुळकर कॉलनी याठिकाणी बस थांबा आहे. मात्र, बसची वाट पाहत बसण्यासाठी बाके नाहीत की शेड देखील नाही. रणरणत्या उन्हात प्रवाशांना बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे बस थांब्यावर प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर शेड उभारावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
सध्या घरात फॅनखाली बसले तरी अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. एवढी उष्णता वाढली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना रखरखत्या उन्हात पदपथावर उभा राहून बसची वाट पाहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची काळजी घेत ज्या ठिकाणी बस थांब्याची गरज आहे तेथे थांबा उभारावा. – प्रवासी, पीएमपी.