Jaikishan Dayabhai Panchal : 41 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, पण गाणी आजही अजरामर; राज कपूर यांच्या चित्रपटांचा ‘हा’ संगीतकार कोण?
Jaikishan Dayabhai Panchal : ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘मेरा जूता है जापानी’, ‘आवारा हूँ’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ यांसारखी गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. या अजरामर संगीतामागे असलेल्या प्रतिभावान संगीतकारांपैकी एक म्हणजे जयकिशन.

Jaikishan Dayabhai Panchal : हिंदी चित्रपटसृष्टीतील १९५० ते १९७० हा काळ आजही ‘सुवर्णकाळ’ अर्थात ‘Golden Era’ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली. अनेक कलाकार स्टार म्हणून उदयास आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळातील असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘मेरा जूता है जापानी’, ‘आवारा हूँ’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ यांसारखी गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. या अजरामर संगीतामागे असलेल्या प्रतिभावान संगीतकारांपैकी एक म्हणजे जयकिशन.
संघर्षाच्या काळात कारखान्यात काम
जयकिशन दयाभाई पांचाल यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी गुजरातमधील बन्सदा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले आणि हार्मोनियमवर प्रभुत्व मिळवलं. संगीताची ओढ त्यांना मुंबईत घेऊन आली; मात्र चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रवास सहज नव्हता. संघर्षाच्या काळात त्यांनी एका कारखान्यात काम केलं आणि त्याचबरोबर चित्रपटांमध्ये संगीत देण्याची संधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
हार्मोनियम वाजवण्याची संधी
जयकिशन यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शंकर यांच्याशी झालेली भेट. गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्या कार्यालयाबाहेर झालेली ही भेट पुढे मैत्रीत आणि त्यानंतर एका ऐतिहासिक संगीतकार जोडीमध्ये बदलली. शंकर यांनी जयकिशन यांच्यातील संगीताची प्रतिभा ओळखली आणि त्यांना पृथ्वी थिएटरमध्ये हार्मोनियम वाजवण्याची संधी दिली. याच ठिकाणी दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली.
टआग’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून काम
पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असतानाच राज कपूर यांचं लक्ष या गुणी जोडीकडे गेलं. सुरुवातीला शंकर-जयकिशन यांनी संगीतकार राम गांगुली यांच्यासोबत ‘आग’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४९ मध्ये आलेल्या ‘बरसात’ने त्यांच्या कारकिर्दीला नवं वळण दिलं. ‘बरसात’च्या यशानंतर शंकर-जयकिशन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
यानंतर ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘चोरी चोरी’, ‘अनारी’, ‘बसंत बहार’, ‘जंगली’, ‘संगम’, ‘सूरज’, ‘ब्रह्मचारी’, ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘अंदाज’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. विशेषतः राज कपूर यांच्यासोबतच्या त्यांच्या सहकार्याने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय गाणी दिली.
‘मेरा जूता है जापानी’ या गाण्याने देशाच्या सीमा ओलांडून जगभरात लोकप्रियता मिळवली. ‘श्री ४२०’मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे पावसात चित्रित झालेलं गाणं आजही हिंदी सिनेमातील लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. ‘आवारा हूँ’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’ यांसारख्या गाण्यांनीही अनेक पिढ्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
‘शंकर-जयकिशन’
शंकर-जयकिशन जोडीची काम करण्याची पद्धतही विशेष होती. दोघेही स्वतंत्रपणे अनेक चाली तयार करत असत; मात्र कोणती चाल नेमकी कोणी तयार केली, हे ते सार्वजनिकपणे सांगत नसत. त्यांच्या मते श्रेय हे स्वतंत्रपणे शंकर किंवा जयकिशन यांना नव्हे, तर संपूर्ण ‘शंकर-जयकिशन’ या जोडीला मिळणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांच्या संगीताची ओळखही कायम या जोडीच्या नावानेच राहिली.
नऊ फिल्मफेअर पुरस्कार
या जोडीने आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी तब्बल नऊ फिल्मफेअर पुरस्कार मिळवले. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावता येतो की त्या काळातील मोठे बॅनर आणि आघाडीचे कलाकार शंकर-जयकिशन यांच्या संगीतासाठी उत्सुक असत.
यकृताच्या सिरोसिसमुळे निधन
‘चोरी चोरी’, ‘अनारी’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘प्रोफेसर’, ‘सूरज’, ‘ब्रह्मचारी’, ‘पहचान’ आणि ‘मेरा नाम जोकर’ यांसारख्या चित्रपटांच्या संगीताने त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली. मात्र, या यशस्वी प्रवासाला अवघ्या ४१ व्या वर्षी दुःखद विराम मिळाला. १२ सप्टेंबर १९७१ रोजी यकृताच्या सिरोसिसमुळे जयकिशन यांचं निधन झालं. आयुष्य अल्प लाभलं असलं तरी त्यांच्या संगीताचा ठेवा मात्र कायमचा अजरामर झाला.
संगीताची जादू कायम
जयकिशन यांच्या निधनानंतर शंकर यांनी संगीत देण्याचं काम सुरू ठेवलं. काही चित्रपटांमध्ये मात्र संगीतकार म्हणून ‘शंकर-जयकिशन’ हेच नाव वापरण्यात आलं. आज अनेक दशके उलटून गेल्यानंतरही त्यांच्या संगीताची जादू कमी झालेली नाही. उलट नव्या पिढीलाही ‘आवारा हूँ’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आणि ‘मेरा जूता है जापानी’ यांसारखी गाणी तितकीच भावतात. त्यामुळे जयकिशन यांचं नाव आणि त्यांचं संगीत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम अजरामर राहणार आहे.








