प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा परिसरातील कोरेगाव पार्क मधील जमिनीचा व्यवहार झालाच नाही. कागदपत्रांवरून खरेदीखत व्हायच नको होतं. परंतु, या जमीन व्यवहाराची नोंदणी कशी झाली, हा प्रश्न आहे. या व्यवहार प्रकरणी राज्य सरकारने प्रशासनातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून, त्यांना चौकशीसाठी एक महिना कालवधी दिला आहे. चौकशीतून खरं काय ते, समोर येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरेगाव पार्क जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. त्यानंतर त्यांचे वडील अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी दिली. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी याच मुद्दयावर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली.या संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी होईल. पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन, सरकारची फसवणूक व्हायला नको. जे व्यवहार करताच येत नाहीत, ज्याच्या नोंदीच होऊ शकत नाहीत. ते करण्याचे धाडस काहींनी दाखवले आहे. ते कशामुळे दाखवले, त्याच्यामध्ये कोणी फोन केला आहे का? कुणी दबाव आणला का? त्यापद्धतीने सर्व तपास करायला सांगितला आहे, त्याबद्दलचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आपल्याला वस्तूस्थिती कळेल, असेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच, भविष्यात असे प्रकरण होणार नाही, समितीने काय चौकशी केली पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे, असेही समितीला सूचविण्यात आले आहे. बदनामी करू नका ! जमीनीचा जो कागद, व्यवहार होण्याचे कारण नाही, ज्याच्यात एक रुपयाही दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही. अशा गोष्टी असूनही तो केला गेलेला आहे. जो कागद केला होता, त्याला ग्राह्य धरले गेले होते तर ते आता रद्द करण्यात आले आहे. जे खरे असेल तेच दाखवा, परंतु, जे खरे नसेल तर त्याची बदनामी करू नका, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे. पार्थने या प्रकरणातून धडा घ्यावा ! यावेळी अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांच्याविषयीही भाष्य केले. ते म्हणाले की, मला हा व्यवहार माहिती नव्हता. नाही तर असे करू नको असे पार्थला सांगितले असते. मी उद्या मुंबईत जाऊन पार्थला सांगेन की, या प्रकरणावरून शिकले पाहिजे. कोणताही व्यवहार करताना तज्ज्ञ वकील अथवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायचे असते. या सर्व प्रकरणावरून पार्थने धडा घ्यायला हवा.