Parth Pawar – (स्व) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अचानक पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांसह बारामतीकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. पार्थ पवार यांच्या पाहणीमुळे अजितदादांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अजितदादा पवार यांची कार्यशैलीचा प्रत्यय आल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते आशावादी झाले आहेत. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि.१४) बारामतीत झंझावाती दौरा करून ‘जनता दरबार’ची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बारामती व इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेऊन विकासकामांबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार यांनी (दि. १५) कोणतीही पूर्वसूचना न देता विकासकामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आखला. त्यांनी थेट कामांच्या ठिकाणी जाऊन प्रगतीचा आढावा घेतला. कामांची गुणवत्ता, निधीचा वापर, सुरक्षेचे निकष आणि ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण होणार का, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले. त्यांच्या नेमक्या आणि मुद्देसूद प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी लागली. विविध प्रकल्पांची पाहणी दौऱ्यात त्यांनी फॉरेस्ट परिसरातील बटरफ्लाय गार्डन, ॲडव्हेंचर पार्क तसेच उभारणी सुरू असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाची पाहणी केली. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, प्रकल्प भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरावेत आणि बारामतीचा विकास वेगाने पुढे जावा, यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. पार्थ पवार यांच्या कामकाजातील बारकाई, थेट संवाद आणि निर्णयक्षमता पाहून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “अजितदादांचीच छबी” असल्याची भावना व्यक्त केली. बारामतीच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या पाहणी दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून आला. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारावर लक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून अजितदादांच्या विचारांचा आणि समाजकार्य, लोकहिताचा पायंडा सुरूच ठेवला आहे. यावेळी पवार यांनी बारामती शहर आणि तालुक्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे. या संस्थांवर आता सुनेत्रा पवार या काटेकोरपणे लक्ष ठेवणार असल्याचे संकेत पहिल्याच बैठकीतून मिळाले आहेत. अजित पवार यांनी सर्व सहकार संस्थांवर लक्ष ठेवले होते. तसेच वेळप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. त्यामुळे यापुढेही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.