पाथर्डी – भाजपच्या अंतर्गत राजकारणात पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याने अस्वस्थ झालेल्या तालुक्यातील मुंडे समर्थकांनी ‘पंकजाताई .. आमच्या आशा… आमचा वारस’ हे अनोखे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात मुंडे यांचा प्रभाव आहे, त्या मतदारसंघात भाजपचे नेते आले, तर त्यांना उघडपणे जाब विचारला जाणार आहे. पक्षात राहून वरिष्ठ नेत्यांना भावना पोचविण्यासाठी अभियान आयोजित केले असून, अभियानांतर्गत केंद्रीय नेतृत्वाला दहा लाख ई-मेल व एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण यांनी दिली.
ही मोहीम ओबीसी मतदारांचा प्रभाव असलेल्या 78 मतदारसंघांतून संयुक्तरीत्या राबवली जाणार आहे. मोहिमेसाठी पाथर्डी तालुक्यातून केकाण यांनी पुढाकार घेतला आहे.
केकाण म्हणाले की, ‘मुंडेंचा प्रभाव हा राज्यातील बीड जिल्हा, तसेच येवला, सिन्नर, सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगाव-शेगाव, रिसोड, मालेगाव, वाशीम, अहमदपूर, लातूर, येवला, इगतपुरी यांसह नााशिक पट्ट्यातील बहुतांशी मतदारसंघ, नगरमधील पाथर्डी, जामखेड, राहुरी, कर्जत, नेवासा, हिंगोली, गंगाखेड, कळमनुरी, जिंतूर, सेलू, मानवत, वसमत अशा एकूण 78 मतदारसंघांत आहे. त्यामुळेच प्रत्येक विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे व त्यानंतर पंकजा मुंडेंची प्रचार सभा ठरलेली असते. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित असतानाही पंकजा मुंडे यांनी संघर्षयात्रा काढल्या. त्यातूनच महाराष्ट्रात सेना-भाजपची सत्ता आली.’
‘सत्तेत मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी कामाचा चांगला ठसा उमटवला. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जनतादेखील त्यांना पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले. त्यामुळेच पक्षांतंर्गत फडणवीसांचा सुप्त विरोध सुरू झाला. त्यांना डावलण्याचे काम सुरू झाले. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून अत्यंत भरीव काम ग्रामीण भागात करून त्यांचा ठसा उमटवला असतानाही त्यांच्याकडील जलसंधारण खाते काढून ते राम शिंदे यांना जाणीवपूर्वक देण्यात आले. विधानसभेला धनंजय मुंडे यांना पडद्याआड ताकद देण्यात आली.’
‘नुकतेच विधानपरिषद निवडणुकीत मास लिडर असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून एक वर्ष फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेल्या श्रीकांत भारती व ओबीसीचा चेहरा बनू इच्छित असलेल्या राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात येऊन पंकजा मुंडेसमर्थकांची अडचण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.’
‘स्व. मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन पंकजा मुंडेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुुरू आहे. फडणवीस यांना मुंडे या डोईजड होत चालल्याने त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याने ओबीसींना आज राज्यात नेता राहिला नाही. राज्यात मुंडे यांची काय ताकद आहे ते दाखवण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेत केंद्रीय नेत्यांना आम्ही नाराज आहोत, आमचे गाव, तालुका नाराज आहे. महाराष्ट्र भाजप नाराज आहे. पंकजाताईंना न्याय द्या… अशा आशयाचे दहा लाख ई- मेल केले जाणार असून, एक लाख पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडामुळे पाथर्डी तालुका हा राजकारण, समाजकारण, धर्मकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याच ठिकाणावरून पुन्हा भाजपअंतर्गत संघर्षाला सामोरे जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे.’
‘पंकजा मुंडेंना समर्थन देण्याकरिता सुरू होणार्या मोहिमेमध्ये ज्या मतदारसंघात मुंडे यांचा प्रभाव आहे त्या मतदारसंघात भाजपचे नेते आले, तर त्यांना उघडपणे जाब विचारला जाणार आहे. नेत्यांच्या कपटनीतीला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज झालो असून, भाजपमध्येच राहायचे, कोणत्याही पदाची किंवा उमेदवारीची अपेक्षा आमची नाही. पंकजा नाही तर भाजप नाही,’ अशी आमची भूमिका असल्याचे केकाण यांनी शेवटी सांगितले.