नागपूर : राज्यात जेथे शाळा तेथे शिक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असून एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य किरण सरनाईक यांनी अनेक शाळांमध्ये संचमान्यतेमुळे शिक्षक उपलब्ध होणार नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, संच मान्यतेबाबतच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयावरील याचिका निकाली काढून उच्च न्यायालयाने हा शासन निर्णय वैध ठरवला आहे. सध्या राज्यात सुरू असलेली विकास कामे, उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा यामुळे दुर्गम, डोंगरी किंवा नागरी भाग असा फरक राहिलेला नसून कोणतीही शाळा पटसंख्येअभावी शिक्षकाविना राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी शिस्त यावी, त्यांना एनडीए मध्ये प्रवेश घेता यावा या उद्देशाने सैनिकी शाळांना केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील या शाळांना सोयी सुविधा पुरविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी विधान परिषदेत सांगितले.