माधव विद्वांस
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक, तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. आजी-आजोबांच्या छायेत रोहे येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. मंदिरात भगवंत नसून तो केवळ माणसाच्या हृदयात आहे, तेव्हा या माणसात असलेल्या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. सद्वर्तनातून देवाची भक्ती होते हे सामान्य माणसाला त्यांनी पटवून दिले. कर्मकांडाच्या पलीकडे सदाचरणातूनच भक्तिमार्ग जातो अशी त्यांची शिकवण होती.
अंधश्रद्धा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थिती पुढे हतबल झालेल्या समाजाला गीताविचारांची दिशा दाखवण्याचे काम त्यांनी आयुष्यभर जोपासले व त्यातूनच लाखोंचा परिवार त्यांनी निर्माण केला. त्यांचे आजोबा स्व. लक्ष्मणशास्त्री आठवले यांच्या संस्कारामुळे त्यांची वृत्ती अध्यात्मिक झाली.लहानपणापासून त्यांनी धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्यातूनच त्यांची मते ठाम बनत गेली. आजोबांच्या निधनानंतर ते मुंबईला आले. त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शाळेत घातले. पारंपरिक शिक्षणाबरोबर “सरस्वती संस्कृत पाठशाळेत’ संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदान्त, साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडुरंगशास्त्री यांनी केला.
वर्ष 1926 मधे गीतेचा अर्थ व त्यातील कर्मयोग कळावा यासाठी त्यांच्या वडिलांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा’ या पाठशाळेची माधवबाग, मुंबई येथे स्थापना केली. आपल्या मुलाचे संस्कृत व गीतेवरील प्रेम यामुळे आपल्या मुलाने हे कार्य पुढे न्यावे असे त्यांना वाटू लागले. मुंबईत आल्यावर ते न्यायव्याकरणशास्त्रात व इंग्रजी भाषेत निष्णात झाले. वयाच्या 22 व्या वर्षी दादाजी “भगवद्गीता पाठशाळेच्या’ व्यासपीठावरून रोज सायंकाळी निरूपण करू लागले. तर दर रविवारी सकाळी भारतीय परंपरेतील विविध दर्शनांवर व इतर विचारप्रणालींवर तरुणांचे अभ्यासवर्गही घेऊ लागले.
मोकळ्या वेळेत ते एशियाटीक सोसायटीच्या ग्रंथालयात आधुनिक मानव्य विषयावरील ग्रंथांचे वाचन करू लागले. त्याच वेळी त्यांनी शरीरशास्त्राचाही अभ्यास केला. दरम्यान जपानमध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांना जाण्याचा योग आला. या परिषदेतील “अवतारवाद’ या विषयांवरील त्यांचे व्याख्यान अत्यंत प्रभावी ठरले. यावेळी डॉ. कॉम्प्टन या नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थ वैज्ञानिकाने त्यांना अमेरिकेच्या व्याख्यान दौऱ्याचे आमंत्रण दिले; पण त्यांनी ते स्वीकारले नाही.
त्यांना रेमन मॅगसेसे, टेम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. स्वाध्याय चळवळ अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली आहे. 25 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. आजपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.