प्रभात वृत्तसेवा सोरतापवाडी – आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा बंडखोरी अटळ असल्याची चर्चा पूर्व हवेलीतील अनेक गावांत जोर धरू लागली आहे. लोकांना नडणारा नाही, तर लोकांसाठी लढणारा उमेदवार निवडा, अशी स्पष्ट भूमिका नागरिक व कार्यकर्ते मांडत आहेत.राज्यात 15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून, त्यातील उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीतील राजकीय वातावरण तापले असून, अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना तीव्र झाली आहे. परिणामी, काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी ऐनवेळी पक्षांतर करून उमेदवारी घेतली असून, मूळ पक्षाचा उमेदवार पाडण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे. पूर्व हवेलीतील पंचायत समिती अंतर्गत उरुळी कांचन-सोरतापवाडी गट, थेऊर-आव्हाळवाडी गट, लोणी काळभोर-कदमवाकवस्ती गट, कोरेगावमुळ-केसनंद गट असे चार प्रमुख गट असून उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, आव्हाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, केसनंद व कोरेगावमुळ हे गण येतात. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ताकद तुलनेने अधिक असून भाजपही जोरदार तयारीत आहे. मात्र, ऐनवेळी आयारामांना उमेदवारी दिल्यास निष्ठावंत कार्यकर्ते दुसर्या पक्षाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवतील, असा इशारा खुलेआम दिला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. उमेदवारी न मिळाल्यास पुढील रणनीती आखण्याबाबत इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. काही नेते नाराज गटाला एकत्र करून हवेली विकास आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. महापालिका निवडणुकांमध्ये तिकीट वाटपावरून झालेली बंडखोरी पंचायत समिती निवडणुकांत होऊ नये, यासाठी सर्वच पक्ष सध्या सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे. तरीही, जर आयारामांना प्राधान्य दिले गेले, तर टोकाची भूमिका घेण्याचा इशारा निष्ठावंत कार्यकर्ते देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तिकिटासाठी हालचाली पूर्व हवेलीतील काही जिल्हा परिषद गटांमध्ये आपले तिकीट फिक्स आहे असे काही इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये सांगत असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही, असे पक्ष पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. फक्त कोरेगावमुळ-केसनंद गटात आमदार माऊली कटके यांनी सुरेखा हरगुडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. इतर गटांमध्ये उमेदवारीसाठी विविध पक्षांतून हालचाली सुरू असल्याची चर्चा पूर्व हवेलीत आहे.