इस्लामाबाद: पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आज साजरा करण्यात आला. यानिमीत्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात बोलताना राष्ट्राध्यक्ष अरिफ अल्वी यांनी चांगलीच मुक्ताफळे उधळली. ते म्हणाले की पाकिस्तानी आणि काश्मीरी एकच असून आम्ही काश्मीरी जनतेच्या पाठीशी ठामपणे उपलब्ध आहेत.
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याच्या भारताच्या भूमिकेला पाकिस्तानचा ठाम विरोध आहे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दाद मागणार आहोत असे त्यांनी नमूद केले. भारताने हा निर्णय एकतर्फी घेऊन केवळ संयुक्तराष्ट्रांच्या ठरावाचेच नाही तर सिमला कराराचेही उल्लंघन केले आहे. आम्ही काश्मीरीजनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एकही कसर बाकी ठेवणार नाही. आम्ही काश्मीरींना पाकिस्तानपासून वेगळे मानतच नाही. त्यांचे दु:ख ते आमचे दु:ख आणि त्यांचे अश्रु ते आमचे अश्रु. त्यामुळे आम्ही त्यांची साथ आणि सहकार्य कदापिही सोडणार नाही.
सीमावर्ती भागात गोळीबार करून भारत शस्त्रसंधी कराराचा सातत्याने भंग करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. पाकिस्तान हा शांतता प्रेमी देश आहे. काश्मीरची समस्या शांततापुर्ण आणि चर्चेच्या मार्गाने सोडवण्याची आमची तयारी आहे. तथापी आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा गैरसमज भारताने करून घेता कामा नये अशी सुचनाहीत्यांनी यावेळी केली. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशात अन्यत्रही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच विविध मशिदींमध्ये विशेष प्रार्थना सभाही आयोजित करण्यात आल्या होत्या.