इस्लामाबाद -पाकिस्तानने शुक्रवारी 360 भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा केली. त्या कैद्यांमध्ये 355 मच्छिमारांचा समावेश आहे. चालू महिन्यात चार टप्प्यांत भारतीय कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली.
सध्या पाकिस्तानी तुरूंगांमध्ये 537 भारतीय कैदी आहेत. तर भारतीय तुरूंगांमध्ये 347 पाकिस्तानी कैदी आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानच्या निर्णयावर भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा त्या देशाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमेची स्पष्ट आखणी झालेली नाही. त्यातून एकमेकांची सागरी हद्द ओलांडल्याच्या आरोपावरून दोन्ही देशांकडून परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक केल्या जाण्याच्या घटना वारंवार घडतात.