श्रीनगर – सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन नागरीवस्त्यांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरीमधील नागरीवस्त्यांवर गोळीबार, तोफांचा मारा सुरु होता. पाकिस्तानच्या या गोळीबारात सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. तर अनेक नागरीक जखमी झाले होते. याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचीही जिवीतहानी झाली आहे. पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूँछ आणि राजौरी सीमेवरील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानने सोमवारी केलेल्या तोफ गोळयांच्या माऱ्यात तिघांचा मृत्यू झाला 24 जण जखमी झाले. त्यामुळे भारतीय सैन्याकडून आज अशा प्रकारची जोरदार कारवाई करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधील राखचीकरी आणि रावलकोट भागातील सात चौक्या उद्ध्वस्त झाल्या. यात तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.