Pahalgam Attack – काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाममध्ये एक अकल्पनीय आणि काळजाला चिरत जाणारा दहशतवादी हल्ला घडला. ज्यात देशभरातील 26 पर्यटकांचे प्राण गेले. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. ज्यात डोंबिवलीतील तीन मावस भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तीन नातेवाइक एकत्र फिरायला गेले होते, पण परतले केवळ आठवणी आणि अश्रू घेऊन. संजय लेलेंचा मुलगा हर्षल लेले यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण हल्ल्याचा थरार सांगितला आणि उपस्थितांचे काळीज हेलावलं. दहशतवादी आले, त्यांनी गोळ्या झाडल्या आणि निघून गेले… एखाद्या चित्रपटामध्ये वाटावा असा क्षण प्रत्यक्षात आम्ही अनुभवला, अशा शब्दांत हर्षल लेले यांनी पहलगाममधील रक्तरंजित घटनेचे वर्णन कले. त्याने सांगितले की, गोळीबार सुरु झाला तेव्हा माझा हात डोक्यावर होता. ते दहशतवाद्यांना विनंती करत होते की गोळीबार करू नका. त्यांनी हात वर केला होता. त्या क्षणी माझ्या हाताला काहीतरी जाणवलं आणि वाटलं की माझ्या हाताला गोळी लागली. पण माझ्या हाताला चाटून गेलेली गोळी वडिलांनी लागली होती. मागे वळून पाहिले तेव्हा वडिलांचे डोकं रक्ताने माखलेले दिसले, असे सांगताना हर्षलच्या आवाजात वेदना दाटून आल्या. हर्षल लेले म्हणाला की, ही संपूर्ण घटना दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पहलगाम येथे घडली. हल्ल्यानंतर आम्हाला स्थानिकांनी सांगितलं की, आधी तुम्ही तुमचा जीव वाचवा. पण आम्ही जिथे होतो, तिथे वाहन जात नाही, फक्त घोड्यावरून जाता येतं. आम्ही बैसरन पर्वत रांगांमधून खाली चालत उतरायला लागलो आणि त्या प्रवासाला चार तास लागले. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. आम्ही तिला खांद्यावर उचलून खाली आणलं. नंतर घोड्यांनी तिला बेसला पाठवलं. घटनेनंतर सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं, असंही त्याने सांगितलं.