केतकावळे – पुरंदर तालुक्यातील केतकावळे-कुंभोशी, देवडी, चिव्हेवाडी नारायणपूर हा भाग पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या भागात जुलै, ऑगस्ट महिन्यात वर्षा विहार सहली होतात; परंतु याच आगाराकडे पावसाने जुलै महिना संपत आला तरी पाठ फिरवली आहे. यामुळे येथील भातलागवड रखडली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे; परंतु पुरंदर तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात करोनाच्या संकटाबरोबरच निसर्गानेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे आज संपूर्ण आषाढ महिना संपून श्रावणाच्या सरीपण पडत नसल्याने या भागात भात लागवड झाली नसल्याचे केतकावळे येथील माऊली बाठे, केतकावळे गावचे माजी सरपंच सतीश बाठे, चिव्हेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब साबळे यांनी सांगितले.
जून महिन्यात वादळ आले. त्यावेळी झालेल्या मोठ्या पावसानंतर या भागात एकही मोठा पाऊस झाला नाही. भातखाचरे मशागत करून परत मशागती करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मागील वर्षी भाताचे पीक चांगले आले; परंतु काढणी आधी झालेल्या ढग फुटीने सर्व पिके मातीसह वाहून गेली. यंदा पावसाने दडी मारल्याने भात रोपे शेतातच असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त भात लागवड झाल्याचे चित्र आहे.