सातारा – “गोपीचंद पडळकर हा माणूस माझ्यादृष्टीने नोंद घेण्यासारखा नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना सध्या काही काम नसल्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून काहीही बोलत असतात,’ अशी खिल्ली उडवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपल्यावरील टीका आणि आरोपांकडे दुर्लक्ष केले.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि व्यवस्थापन परिषदेसाठी शनिवारी शरद पवार सातारा येथे आले. व्यवस्थापन परिषद बैठक संपल्यावर काही वेळाने जनरल बॉडी सुरू होणार होती.
तत्पूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर सभा सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत- चीन युध्दजन्य परिस्थिती, करोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था, महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्ष याविषयांवर चर्चा केली. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. “तुम्ही ज्यावेळी साताऱ्यात येता त्यावेळी सर्वांचे लक्ष तुमच्याकडे असते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुमच्यावर तुमच्यावर केलेल्या टीकेला तुम्ही अजून उत्तर दिले नाही.
तुम्ही आता त्याला साताऱ्यातूनच उत्तर देण्याची लोकांची अपेक्षा आहे,’ असे निदर्शनास आणून देताच त्यांनी पडळकर यांची नाव न घेता खिल्ली उडवली. ते म्हणाले, “त्या टीकेला फार काही महत्व द्यावे आणि त्याला उत्तर द्यावे असे वाटत नाही. मला माहित आहे की माझ्याविरोधात लोकसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. बारामती विधानसभा लढवली तिथे अनामत जप्त झाली. सांगली लोकसभा लढवली आणि तिथेही अनामत जप्त झाली असे माझ्या वाचनात आले.’ जे बारामतीत पडले, सांगलीत पडले आणि अशा लोकांना समाजाने ज्या त्या वेळी बाजूला केले. त्या लोकांची आपण नोंद तरी कशाला ठेवायची, अशी उपरोधिक टीकाही पवारांनी केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कोणताही आधार नाही, असे सांगून ते म्हणाले, “काहींना (देवेंद्र फडणवीस) आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात.’लॉकडाऊनच्या काळात लोक सहन करतायत. त्याचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप पवारांनी पेटोर्ल दरवाढीच्या अनुषंगाने केला. इंधनाची रोज होणारी दरवाढ ऐतिहासिक असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रात विविध उद्योगांत काम करणारे परराज्यातील मजूर त्यांच्या मनामध्ये करोनाविषयीची भीती होती. विशेषतः मुंबईत करोना वाढत असल्याने भीती अधिक बळावलेली होती. लोकांच्या मनातील भीती जावी, यासाठी मी महाराष्ट्रात फिरत आहे, असे त्यांनी सांगितले.