शिरूर : शिरूर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत न्याय व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी दि. ०३ रोजी निलेश वाळुंज यांनी कार्यकर्त्यासमोर तहसील कार्यालयासमोर शांततामय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान बहुतेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयम राखत शांततेत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, एका महिला पोलिस अधिकार्याच्या चिघळवणाऱ्या वर्तनामुळे परिस्थिती क्षणिक तणावपूर्ण बनली होती. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला अधिकारी यांनी नागरिकांशी उग्र व रागीट भाषेत बोलत अनावश्यक संताप व्यक्त केला. आंदोलन शांततेत सुरू असताना अशा प्रकारचे वर्तन हे “जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता काय?” असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती. दुसरीकडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत, गोविंद खटिंग तसेच हवालदार विनोद काळे, सचिन गोरे व शेलार यांनी दाखवलेला संयम व शिस्तीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत वरिष्ठांकडे अभिप्रायही कळविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित महिला पोलिस अधिकारीविरोधात मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि शिरूरपोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे असे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने ही तक्रार गृह विभागाकडे पाठवली असून, पोलिस महासंचालकांनीही पुढील कार्यवाहीसाठी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना निर्देश दिल्याचे समजते. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले, “ही लढाई केवळ एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर लोकशाही मूल्यांचा आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराच्या संरक्षणाची आहे. नागरिकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या बेजबाबदार लोकसेवकांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय समाधान होणार नाही.” या प्रकरणी काय निपक्षपाती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.