मुंबई: महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्या हाती असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे. गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती, असे म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगाविला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, रिक्षा हे गरिबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. कोणी असा समज करुन घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन.
माझं मत मी लोकांसोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच. पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं, ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय!, असा सवाल त्यांनी केला.
सरकारमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहेत. यापैकी कॉंग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे. आता आघाडीत कोणतीही कुरबुरी नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरुन किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोड्याफार सुरु असतात, असे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर सुधीर मुनगंटीवर म्हणाले, हे वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मनातील “द्वंद्व’ आहे. 30 वर्षे जुन्या मित्राला बाजूला सारत वैचारिक मेळ नसलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही हिंमत त्यांच्या कामात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले असेल तर इतरांना पोटदुखी का होईल? उद्धव ठाकरे मित्र आहेतच त्यांनी जनादेशाचा अवमान केला म्हणून त्यांचे महत्त्व आम्ही कमी करणार नाही. त्यांच्या हातून उत्तम काम व्हावे अशी सदिच्छा. केवळ ठाकरेच नव्हे, तर राज्यात करोना काळात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचे काम करत आहे. सरकारच्या कामकाजातील उणिवा सांगणे म्हणजे कमी लेखणे नव्हे, असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र काही लोक राम मंदिराचे भूमिपूजन होऊ नये यासाठी वेगवेगळी कारणे शोधत आहेत. विद्यमान करोना संकट आणि राम मंदिराचे भूमिपूजन यांचा संबंध नाही. अयोध्येत देशभरातील रामभक्त गर्दी करणार नाही. मोजक्या संख्येत हा कार्यक्रम होणार आहे. प्रभू श्रीराम भारतीय आस्थेचे प्रतीक आहे. रामायणात देखील प्रभू श्रीरामचंद्रांना अशाच वृत्तीने त्रास दिला होता. त्याच प्रवृत्ती सध्या मंदिराला विरोध करत आहेत, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.