Otur Bus Stand – शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील ओतूर हे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक असून येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकातील अपुर्या सुविधा आणि सावलीअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बसस्थानक उभारल्यानंतर आजपर्यंत कोणताही मोठा बदल किंवा विस्तार न झाल्याने येथील बैठक व्यवस्था अपुरी पडत आहे. अनेक वेळा प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नसल्याने भर उन्हात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. वाढत्या तापमानामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. ओतूर हे महामार्गावरील प्रमुख केंद्र असल्याने येथे राज्याच्या विविध भागांतून येणार्या एसटी बसेसची मोठी ये-जा असते. परभणी, संभाजीनगर, लातूर, बीड, शिर्डी, अकोले, पंढरपूर, ठाणे, कल्याण, मुंबई, पालघर, वसई यांसह अनेक ठिकाणांहून येणार्या लांब पल्ल्याच्या बससेवा तसेच तालुक्यातील शटल बसेसमुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत बसस्थानकातील निवारा आणि बैठक व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे प्रवाशांना सावलीची नितांत गरज भासत असून परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या संदर्भात संबंधित एसटी विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्नर तालुक्यातील इतर बसस्थानकांचे नूतनीकरण झाले, मात्र ओतूर बसस्थानकाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ओतूर बसस्थानक अद्ययावत करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.