आतापर्यंत घेण्यात आल्या 325 ग्रामसभा : आराखडे वेबसाइटवर अपलोड करावे लागणार
पुणे – पुढील पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील गावांचा विकास आराखडा कशापद्धतीने असावा, कोणती कामे प्राधान्याने घ्यावीत. तसेच रस्ते, शिक्षण, आरोग्य, उपजिविका यासंदर्भातील खर्चाचे नियोजन कसे करण्यात येईल या संदर्भात 2020-21 ते 2024-25 याचे पंचवार्षिक आराखडे तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन याची माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून देण्यात आली.
“राज्य सरकारने 28 मे 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पंचवार्षिक आराखडे तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि. 6 डिसेंबरला) पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापती, अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 325 ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनी तयार केलेले आराखडे हे ऑनलाइनद्वारे केंद्र सरकारच्या या वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहेत. ग्रामविकास आराखड्यानुसार संबंधितांनी निधी दिली जाईल. एका व्यक्तीला सुमारे 450 रुपये प्रति या प्रमाणे लोकसंख्या आणि गावाच्या क्षेत्रफळानुसार निधी देण्यात येईल. त्याकरिता ग्रामपंचायतींनी आराखडे परिपूर्ण करावेत, असे आवाहनही विश्वासराव देवकाते यांनी केले.
निकषानुसार आराखडा तयार करणे अपेक्षित
पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा विनियोग कशापद्धतीने करण्यात येईल यासाठी पंचवार्षिक आराखडे करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्याकरिता ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण राजीव गांधी पंचायत सशक्त अभियानांमार्फत देण्यात आले आहे. गावाच्या विकासाला ग्रामपंचायत कशापद्धतीने प्राधान्य देत आहे त्याचे प्रतिबिंब आराखड्यात दिसून येईल. आराखडा तयार करताना निकष ठरविण्यात आले. त्यानुसार आराखडा तयार करणे अपेक्षित असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी सांगितले.