मुंबई – राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागानुसार, शुक्रवारी कोकणात पावसाचा रेड तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने, पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवारी, राज्यातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा “रेड अलर्ट’ तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा “ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तसेच सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.