सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काढण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्यात दोन गावांतून तीव्र विरोध करून प्रवेश नाकारण्यात आला. हा प्रकार बार्शी व करमाळा तालुक्यात घडला. त्यावेळी गावक-यांचा रोष दिसून आला.
बार्शी तालुक्यातील पांढरी गावात विकसित भारत यात्रेचा रथ आला असता तेथे गावकरी एकत्र आले. यावेळी तरूण आणि वयोवृध्द शेतक-यांनी प्रथम या नावाच हरकत घेतली. कांदा व इतर पिकांचे दर गडगडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले ? व्यापा-यांचे भले करण्यासाठी शेतक-यांच्या पिकांवर गाढवाचा नांगर फिरविण्यात आला आहे.
वाढत्या महागाईत आमचे जागणेच मुश्किल झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी संताप व्यक्त केला. करमाळा तालुक्यातील पुनवर गावातही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रवेश न देता परत पाठविण्यात आला. रथासोबत सरकारी कर्मचा-यांसोबात भाजपचे कार्यकर्ते होते. यावेळी संबंधित सरकारी कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले.