शिक्रापूर -विकासकामे करत असताना सर्वांनी एकत्र आल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे विरोधकांनी विकासकामांमध्ये राजकारण करू नये, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विरोधकांनी अडवलेल्या दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आढळराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख माउली कटके, सदस्या रेखा बांदल, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, सरपंच हेमलता राऊत, उपसरपंच रोहिणी गिलबिले, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, जयश्री भुजबळ, माजी उपसरपंच सागर सायकर, भगवान वाबळे, नवनाथ सासवडे, जयश्री दोरगे, भाजपचे उपतालुका प्रमुख राजेंद्र मांढरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, दत्तात्रय गिलबिले, सतीश वाबळे, आनंद हजारे, विजय लोखंडे उपस्थित होते.
शिक्रापूर ग्रामपंचायत शिवसेनेची असल्यामुळे येथील विकासकामे अडविण्याचा प्रयत्न होत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः जातीने लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकासकामांचा मार्ग खुला केला आहे. काही लोकांना विकासकामे करण्यापेक्षा विकासकामे अडविण्यात आनंद वाटतो. विरोधकांनो तुम्ही देखील काम करा व आम्हालाही कामे करू द्या, असा सल्ला आढळराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.