maratha reservation – मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) राज्यात परिस्थिती चिघळली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात आज निर्माण झालेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जबाबदार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.
तर महाराष्ट्राचा सर्व समाज, सर्व वर्ग हा मराठा समाजाला आरक्षणाच्या पाठीशी आहे. कोणी विरोधात नाही. एक जरी विरोधात असेल आणि मग रस्ता रोखला, घर जळाले तर ठीक आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन घ्यायचे, कोणती भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे.
त्यामुळे ते जे भूमिका घेतील त्याला भाजपा सहमत आहे. खरंतर मराठा समाजावर जो अन्याय झालाय त्यात कुणी दोषी आहे तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात अडीच वर्ष आले असते, योग्य वकील लावला असता तर ही परिस्थिती उद्धभवली नसती.
मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे हे जर सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिले असत तर हे दिवस नसते आले, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
ठाकरेंनी माफी मागावी
महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे. कारण महाराष्ट्र जो जळतो आहे त्याला एक आणि एकमेव व्यक्ती दोषी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण मराठ्यांना आरक्षण दिले होते.
महाराष्ट्राला माहित आहे की देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता असेल ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि ओबीसींचे आरक्षण कमी न करता दिले होते. यामुळे या भूमिकेतूनच पुढे गेले पाहिजे, असेही बावनकुळे यांनी यावेळी म्हटले.