दुबई – पूर्ण तंदुरुस्त आहे का नाही ते स्वतः रोहित शर्माचा सांगू शकेल, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
जर रोहित तंदुरुस्त असेल तरच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करावे, कारण तो जर पूर्ण तंदुरुस्त नसेल आणि तरीही तो खेळला तर त्याची दुखापत वाढू शकते व त्याचा विपरित परिणाम त्याच्या कारकिर्दीवर होऊ शकतो, असा धोकाही शास्त्री यांनी व्यक्त केला.
फिजीओंनी दिलेल्या अहवालानंतरच निवड समितीने त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. या संपूर्ण प्रक्रियेबात मी निश्चित सांगू शकत नाही; पण जर रोहितला स्वतःला तो पूर्ण मॅचफिट असल्याचा विश्वास असेल तरच त्याने ऑस्ट्रेलियाला जावे अन्यथा पूर्ण तंदुरुस्त नसताना त्याने सामने खेळण्याचा धोका पत्करला तर त्याला भविष्यात खूप मोठे नुकसान सोसावे लागेल.
रोहितने पूर्ण तंदुरुस्त होईपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाऊ नये. एखाद्या खेळाडूसाठी दुखापत होणे म्हणजे सर्वात मोठी निराशाजनक बाब आहे. आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. लवकरात लवकर त्यातून सावरण्याचा आपण प्रयत्न करतो. पण आपण पूर्ण तंदुरुस्त आहोत की नाही हे फक्त स्वतः खेळाडूलाच माहीत असते, असेही ते म्हणाले.