डॉ. रघुनाथ माशेलकर; ‘क्लायमेट कलेक्टिव्ह, पुणे’ उपक्रमांतर्गत वेबिनार
पुणे – निसर्गाची हानी न करता शाश्वत विकास स्वीकारण्याची आज वेळ असून, डिकार्बनायजेशनकडे लक्ष देणे योग्य ठरेल. पर्यावरणपूरक सुविधांचा फायदा भविष्यात उद्योगांना होणार असून त्यादृष्टीने पावले टाकली गेली पाहिजेत. कोविड-19 नंतरच्या आव्हानात्मक काळात “इनव्हेंट इन इंडिया’ सुरू करायला हवे. यामध्ये डिसेंट्रलायजेशन, डिकार्बनायजेशन आणि डिजिटलायझेशन यावर आपण भर दिला पाहिजे, असे पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या “क्लायमेट कलेक्टिव्ह’ पुणे उपक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वेबिनारचे आयोजन केले होते. त्यावेळी
डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, इकोनॉमिक ऍन्ड सोशल अफेअर्स ऑफ द युनायटेड नेशन्सचे माजी सरचिटणीस डॉ. नितीन देसाई, द एनर्जी ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे (टेरी)प्रतिष्ठित फेलो आणि आयपीसीसीचे 2020चे प्रमुख लेखक डॉ. दीपक दासगुप्ता आणि पीआयसीचे संस्थापक विश्वस्त अणि क्लायमेट इकोनॉमिक डायलॉगचे समन्वयक प्रो. अमिताव मल्लिक यांनी यावेळी उपस्थितांशी वेबिनारद्वारे संवाद साधला.
हवामान बदल समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राबवाव्या लागणाऱ्या उपक्रमाद्वारेच अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा अपेक्षित ठिकाणी पोहोचवू शकू. ऊर्जा वापराच्या बदलांकडे लक्ष देण्याबरोबरच कार्बन टॅक्स आणि ऊर्जेच्या वापराचा मोबदला आकारणे हा एक भाग आणि अधिकाधिक नागरिकांनी घरून काम केल्याने जर शहरी भागांत पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत असेल तर असे उपाय अंगीकारणे महत्त्वाचे ठरेल, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.