नवी दिली: राजस्थानातील कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडामुळे पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने एका संकेत स्थळावर प्रसिध्द झालेला एक लेखही चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यानुसार एखाद्या मोठा जनाधार असलेल्या नेत्याने कॉंग्रेसमध्ये बंड करण्याची अथवा पक्षात फूट पडण्याची ही तब्बल 49 वी घटना आहे. त्यातही अशा फुटीतून जे नेते बाहेर पडले त्यांना एकतर पक्षात परत यावे लागले किंवा त्यांचे राजकीय करिअर संपले. केवळ 16 नेतेच पक्षातून बाहेर गेल्यानंतर यशस्वी होऊ शकले. त्यात महाराष्ट्रातील शरद पवार यांचा समावेश आहे.
संबंधित लेखात कॉंग्रेसचे दिवंगत नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या एका वक्तव्याचाही दाखला देण्यात आला आहे. कॉंग्रेस सोडणारे नेते पक्ष सोडताना एखाद्या वाघाच्या अविर्भावात असतात, मात्र शेळी होउन पक्षात परततात अशा आशयाची टिप्पणी एकदा गाडगीळ यांनी केली होती.
मात्र सगळेच नेते कॉंग्रेसमध्ये परतले नाहीत. त्यात शरद पवार यांच्या प्रमाणेच तृणमुल कॉंग्रेस अध्यक्षा आणि प. बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुफ्ती मोहम्मद सईद, जगनमोहन रेड्डी. चंद्रशेखर राव आदी नेत्यांचा समावेश होता. असे हे 16 नेते आहेत. त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यनंतरही त्यांची कारकीर्द बहरली.
ते आजही प्रस्थापित नेते आहेत. अन्य नेते मात्र याबाबत कमी नशिबवान ठरले. त्यांची कारकीर्द अकाली संपली किंवा त्यांना पुन्हा पक्षाची दारे ठोठावावी लागली. यात प्रामुख्याने दिग्गज नेते अर्जुनसिंह, त्यांच्याही अगोदर डि. के. बरूआ, विद्याचरण शुक्ल यांचा समावेश होता. पक्ष सोडल्यानंतर काही काळांनी हे सगळे नेते स्वगृही परतले. पक्षानेही त्यांना पुन्हा सामावून घेतले.
पायलट यांचे काय होणार?
सचिन पायलट यांनी पक्षातून जाउ नये, असाच पक्षाचा प्रयत्न आहे. आपण भारतीय जनता पार्टीत जाणार नसल्याचे खुद्द पायलट यांनी सध्यातरी जाहीर केले आहे. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार राजस्थानात आतापर्यंत कॉंग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांचा वरचष्मा राहीला आहे. याच पक्षांना आलटून पालटून सत्ता मिळाली आहे.
मध्यंतरी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पक्षालही खिळ बसली. आता सचिन पायलट यांनी वेगळा मार्ग पत्करत तिसरी आघाडी स्थापन केली तर त्यांना चांगली संधी आहे.