Onion Price – सध्या शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभर मेहनत, पैसा आणि वेळ खर्च करूनही हातात काहीच राहत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकताच कांद्याचा हंगाम संपला. कांदा हे शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी तब्बल सत्तर हजार रुपयांपर्यंत खर्च आला. बाजारात कांद्याला दहा रुपये किलो दर मिळत असला तरी वाहतूक, हमाली, अडत, बारदाणा व भराईचा खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात अवघे पाच रुपयेच उरतात. एकरी सरासरी दहा टन उत्पादन होऊनही खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यल्प राहत आहे. खते, औषधे, मजुरी आणि वाहनभाडे यासाठी शेतकऱ्याला रोख पैसे मोजावे लागतात. मजुरांची मजुरी निश्चित असते, मात्र शेतमालाला किती भाव मिळेल याची कोणतीही हमी नसते. दिवसभर मजुरी करणाऱ्या मजुराचे पैसे ठरलेले असतात, पण वर्षभर राबणारा शेतकरी बाजाराच्या भरोशावर जगत आहे. माल आडत्याच्या ताब्यात दिल्यानंतर शेतकरी पूर्णपणे “रामभरोसे” राहतो. त्यातच पाणीटंचाई, वीज समस्या, बदलते हवामान, वादळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा बाजारभाव दूधाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, आणि पिक चांगले आले तरी बाजारभावाची शाश्वती नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत असून त्याचे भविष्य अंधारात जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. आज शेतकऱ्याची अवस्था मजुरापेक्षाही बिकट असल्याचे चित्र आहे. मजुराला शासनाचे स्वस्त धान्य आणि दिवसाला ५०० ते ७०० रुपयांपर्यंत रोजगाराची हमी मिळत असल्याने तो काही प्रमाणात समाधानी आहे. मात्र, पाच महिने पोटच्या पोरासारखे जपून, उधार-उसणवार करून घेतलेले पीक जर बाजारभावाच्या भरोशावरच विकावे लागत असेल, तर शेतकऱ्याची अवस्था अधिक हालाखीची असल्याचे बोलले जात आहे. गरिबांसाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी शेती असूनही शेतकऱ्याला ठोस सवलती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जगाच्या पोशिंद्याची जगण्यासाठी धडपड “जगाचा पोशिंदा” म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असून त्याला आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. याच कारणास्तव शेतकरीच शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यासाठी कचरत आहे.“जगाची अन्नसाखळी टिकवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करून शेती पिकवतो… ही आमची चूक आहे का?” असा वेदनादायी प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे.