Onion Price Drop – जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा दुय्यम बाजार आवारात रविवारी (दि. २९) झालेल्या कांदा लिलावात दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, मिळालेला भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा असल्याची भावना व्यक्त होत आहे. रविवारी बाजारात २२९५ क्विंटल कांद्याची आवक झाली, मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खते, औषधे आणि मजुरीचे दर गगनाला भिडले असताना बाजारातील घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला किमान ३५ ते ४० रुपये प्रति किलो भाव मिळाला तरच हा व्यवसाय परवडणारा ठरेल, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे. सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव निश्चित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आळेफाटा (ता. जुन्नर) : मार्केट यार्डात लिलावासाठी येऊन पडलेला कांदा. बाजारभावातील सद्यस्थिती लिलावादरम्यान गुणवत्तेनुसार कांद्याचे दर वेगवेगळे राहिले. मोठ्या आकाराच्या दर्जेदार कांद्याला प्रति १० किलोसाठी १२० ते १३५ रुपये भाव मिळाला. सरासरी आणि मध्यम प्रतीच्या कांद्याचे व्यवहार ७० ते ११० रुपयांच्या दरम्यान झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे छोट्या कांद्याला प्रति १० किलोसाठी केवळ ३० ते ६० रुपये इतका नीचांकी दर मिळाला. यामुळे वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. सरकार झोपले आहे का? खतांचे दर, मजुरी आणि इतर खर्च गगनाला भिडलेत, पण बाजारात भाव मात्र मातीमोल. उत्पादन खर्चही निघत नसताना शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? फक्त पोकळ आश्वासनांनी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून सरकरने भाववाढीसाठी ठोस निर्णय घेण्याची गरजआहे. कांद्याचे उत्पादन यंदा समाधानकारक झाले असले तरी, योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. सरकारने केवळ लिलाव प्रक्रियेवर लक्ष न देता, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल याची खात्री करावी. “कांदा पिकवण्यासाठी खत, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो. पण बाजारात मिळणारा दर पाहता हा खर्चही निघत नाही. शेतकरी जगवण्यासाठी किमान ३५ ते ४० रुपये प्रति किलो दर मिळणे अत्यावश्यक आहे.” – रवींद्र निमसे, शेतकरी, आळेफाटा “मोठ्या कांद्याला थोडाफार दर मिळतो, पण मध्यम आणि छोट्या कांद्यामुळे आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात शेती करणे निव्वळ अशक्य होईल.” – गोविंद गुंजाळ, शेतकरी, बेल्हे