सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून शासकीय रुग्णालयात 364 तर खासगी रुग्णालयात 777 अशा एक हजार 141 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूच्या वाढत्या फैलावामुळे जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर एकाही मृत्यूची नोंद नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली.
जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, कोरेगाव, वाई या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळले असून उर्वरित पाटण, खटाव, माणमध्येही काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप केला होता. विशेषत: सातारा, फलटण, कोरेगाव, कराड, वाई याठिकाणी वाढत्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू फैलावला आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये : संजीवराजे
सातारा जिल्ह्यात डेंग्यूचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असली तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आरोग्य विभागाला याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून फॉगिंग मशीनद्वारे मोठ्या शहरांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. ज्या ठिकाणी पाणी साठून राहत आहे, त्याठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.