सातारा – दिल्लीमधील निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातून सातारा जिल्ह्यात आलेल्या सात जणांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सहा जणांच्या करोना चाचणीचा अहवाल अद्याप मिळायचा असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यातही मरकजहून आलेल्यांची संख्या सात असल्याने जिल्हावासियांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सातही जणांची धरपकड करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या करोना चाचणी अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दिल्ली येथे निजामुद्दीन या ठिकाणी देश व विदेशातील मुस्लिम बांधवांचा मरकजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तेव्हा या ठिकाणी काही करोनाबाधितांचा वावर झाला होता.
त्यांनतर हे सगळे लोक देशभरातील विविध राज्यांत गेल्याने देशात सध्या मरकजमुळे करोनाचे संकट गडद झाले आहे. सातारा जिल्ह्यातही या ठिकाणावरून सातजण आल्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. त्या सात जणांची धरपकड करुन त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन पुण्यातील “एनआयआयव्ही’कडे पाठवले आहेत.
त्यातील एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून बाकी सहा जणांचे अहवाल येणे बाकी आहे. मात्र, या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.