मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक हैं तो सेफ हैंचा नारा चांगलाच गाजला आहे. आता तोच कित्ता साहित्य संमेलनाचे आयोजकही गिरवताना दिसत आहेत. यंदा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीला आयोजित केले जात आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी हे निमंत्रण फेटाळत मराठी साहित्य संमेलनास सहभागी होण्यास नकार दर्शविला आहे.
दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी विद्रोहीच्या संयोजकांना दिले आहे. मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे आयोजित केले आहे. गेल्या १७ वर्षांपासून ज्या ठिकाणी महामंडळाचे संमेलन असते, त्याच दरम्यान विद्रोही साहित्य संमेलनातून विचार मांडले जातात.
यंदाचे महामंडळाचे संमेलन दिल्लीत आहे, तर विद्रोही संमेलनाच्या आयोजनाबाबत डिसेंबर महिन्यात बैठक होणार आहे. महाराष्ट्रात मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी एकोपा असतो हे दाखवण्यासाठी दिल्लीच्या संमेलनातून एक पाऊल पुढे टाकावे, जात- धर्म या आधारावर महाराष्ट्राचे विभाजन करू पाहणाऱ्यांना संदेश द्यावा, या आशयाचे पत्र संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक किशोर ढमाले यांना पाठवून एक प्रकारे संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रणच दिले आहे.
दरम्यान, गेल्या 18 वर्षात विद्रोही संमेलनाचे संयोजक कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच्या व्यासपाठीवर उपस्थित राहिले नाहीत. यंदाच्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विद्रोही साहित्य संमेलनात गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता.