मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील महाराहण प्रकरणी ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. आव्हाड यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
त्यावर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट लिहली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केले होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान या तरुणाला मारहाण केल्यानंतर आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षाने टीका केली होती. भाजपने आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई न केल्यास राज्यात जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला होता. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी म्हंटले आहे कि, सदरील व्यक्ती सतत मला धमक्या देत राहतो, मुलीबद्दल, बायकोबद्दल अश्लील वक्तव्य करतो. मला गोळ्या घालण्याचे वक्तव्य करतो; त्यामुळे कायदा कोण हातात घेतो याचा विचार करायला हवा, असे आव्हाड म्हणाले.