मुंबई – पालघर हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राचे नावलौकीक आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती दाखवण्याचा आभास निर्माण केला जात आहे. पालघरला जे झाले त्याचा करोनाशी काहीही संबंध नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, पालघर प्रकरणात काही तासातच राज्य सरकारने खबरदारी घेत १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. जे घडलं ते चांगल नाही पण या प्रकारातून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली. अशाप्रकारे वातावरण तयार केले जातं पण आज राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाशी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. या संकटाशी लढण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, पालघर प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही. तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.