वाल्हे -करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी पाचव्या महिन्यात प्रवेश करीत असताना आता सर्वच उद्योग कडेलोटाच्या अवस्थेला पोहोचले आहेत. तसाच देशभर पसरलेला दूध व्यवसायही “व्हेंटिलेटर’वर आला आहे. लॉकडाऊनमध्ये दुधाच्या वाहतूक, विक्रीवर बंदी नसली तरी हॉटेल व दुधावरील प्रक्रिया उद्योग बंद असल्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री कॉंग्रेसचे सुनील केदार यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात दुधाची समस्या सुटण्याऐवजी जटील झाला आहे. दुधाचे भाव पडल्याने आणि पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान 10 ते 12 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
यापूर्वी सत्तेत असताना दुधाच्या भुकटीचे अनुदान बंद करणाऱ्या आणि परदेशी दुधाला करात सूट देणाऱ्या भाजपने आंदोलन केले होते. शेतकरी संघटनांचा विषय “हायजॅक’ करण्याचा भाजपचा हा प्रयत्न फसला आहे. शेतकऱ्यांचे तारणहार असल्याची टिमकी वाजवणाऱ्या महाविकास आघाडीचा शेती क्षेत्रातील फुगाही फुटला आहे. परिणामी शेतकरी व पशुपालक हवालदिल झालेले आहेत. सध्या राज्यात दुधाला कमी भाव मिळत असतानाच पिशवीतील दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव वाढवून कंपन्यांनी ग्राहकांची लूट कायम ठेवली आहे.
खास दूध संकलन चालक म्हणतात की…
वाल्हे परिसरामध्ये दररोज जवळपास 4500 ते 4800 लिटर दुधाचे संकलन केले जाते. खासगी दूध संस्था दुधाला 3.5 फॅक्ट, 29 डिग्री असलेल्या दुधाला 20 रूपये भाव देत असून, एक लिटर दूध संकलन करण्यासाठी जवळपास 2 रूपये खर्च येतो. त्यामुळे दूध संकलन करणाऱ्यांपुढे दूध उत्पादकास किती दूध दर द्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती एका खासगी दूध संकलन चालकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे.
सरकार कोणाचेही, शेतकरी वाऱ्यावरच
करोनाचे संकट कोसळलेले असतानाच आता दुधाचे भाव प्रतिलिटर 17 रुपयांवर आलेले आहेत. एकूणच सरकार कोणत्याही पक्षाचे असोत शेतकरी व कष्टकऱ्यांना कोणीही वाली नसल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भाव का पडले?
करोनामुळे हॉटेल, प्रक्रिया उद्योग बंद असल्यामुळे मागणी घटली
भुकटीसाठी जाणाऱ्या दुधात 90, प्रक्रिया उद्योगासाठी 80 व पिशवीबंद दुधाच्या मागणीत 40 टक्के घट केंद्र शासनाने 50 हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय
अतिरिक्त उत्पादन होण्याच्या धोक्यामुळे भुकटी निर्मितीत घट
ज्या पक्षाच्या सरकारने विनाकारण दूध भुकटीची आयात करण्याचा निर्णय घेऊन दुधाचे दर पाडण्यास हातभार लावला आहे. त्यानी आंदोलनाची नौटंकी करणे संतापजनक आहे.शेतकऱ्यांच्या बाबतीतील पुतनामाऊशीचे प्रेम आहे.
– प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे,
माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
इतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने बंद ठेवता येतात, दुकानांचे शटर खाली ओढता येते, “वर्क फ्रॉम होम’करुन कार्यालये चालवता येतात पण दुग्धव्यवसाय बंद करता येत नाही. गायी-म्हशींना चारा घालावाच लागतो, शेण उचलावेच लागते, वेळ झाली की दूध काढावेच लागते. एक दिवसही लांबणीवर टाकता येत नाही.
– सुशांत भुजबळ, आदर्श गोपालक