नवी दिल्ली – ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे बरेच कामगार परत आपल्या घरी जात असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र परिस्थिती एवढी बिघडलेली नाही, असे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. यासंदर्भात केंद्रीय कामगार सचिव सुनील बारथवाल यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कामगार विभागाच्या सचिवाबरोबर चर्चा केली. काही राज्यांनी मोठ्या शहरांमध्ये फक्त रात्रीची संचार बंदी व शनिवारी-रविवारी संचारबंदी जारी केली आहे. यामुळे बांधकाम व्यवसायावर, व्यापारावर किंवा उद्योग आणि दुकानावर कसलाही परिणाम झालेला नाही.
काही ठिकाणी 50 टक्के कामगारांच्या आधारावर काम करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यामुळे कामगारांना घरी परत जाण्याची गरज निर्माण झालेली नाही. कामगारांनी परत घरी जाऊ नये यासाठी या कामगारांना धान्य पुरवठा करण्याची योजना काही राज्यांनी सुरू केली आहे. त्याचबरोबर बांधकाम मजुरांना काही राज्यात मदतीची तयारी सरकारने ठेवली आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकात्ता, बंगळूरु, सिकंदराबाद अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातील घडामोडीकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवर 21 निरीक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे कामगारांना परत घरी जाण्याची गरज निर्माण होणार नाही असे केंद्र सरकारने सांगितले.