संयुक्त राष्ट्रे – करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा डेल्टा व्हेरिएंटने अर्थव्यवस्थेवर परिणाम केला. पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे संकट भारतावर येऊ शकते, अशी भिती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झाले असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेच संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे.
येत्या काळात भारतावर पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचे आर्थिक संकट येऊ शकते, असे या समितीनं नमूद केले आहे. निर्यातीमधील वृद्धी आणि वाढलेल्या गुंतवणुकीमुळे काहीसा फायदा नक्कीच होईल. पण कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि कोळशाची टंचाई येत्या काही काळात अर्थव्यवस्थेची गती मंदावू शकतात. त्यामुळे सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक ठरणार आहे, असे या समितीने नमूद केले आहे.
भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा वेग चांगला असल्याचे देखील संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने नमूद केले आहे. वेगाने होणारे लसीकरण, सौम्य निर्बंध आणि त्याला अनुसरून अर्थविषयक धोरण यामुळे भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढू शकतो, असे यात नमूद करण्यात आले आहे.