Bangladesh PM Swearing-In Ceremony: बांगलादेशातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) चे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. मात्र, या निवडीवरून आता देशांतर्गत राजकारण तापले असून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘राहुल गांधींना रोखल्याचे हे बक्षीस’ – काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी ओम बिर्ला यांच्या बांगलादेश दौऱ्यावरून भाजप सरकारला घेरले आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी हा सरकारकडून बिर्ला यांना मिळालेला एक प्रकारचा ‘पुरस्कार’ असल्याचे म्हटले. सिंह म्हणाले की, “लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखल्याबद्दल केंद्र सरकारने ओम बिर्ला यांना ही जबाबदारी देऊन बक्षीस दिले आहे.” हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी – बांगलादेशातील नव्या सरकारबाबत बोलताना अखिलेश सिंह यांनी केंद्राला सल्लाही दिला. ते म्हणाले की, “आता बांगलादेशात नवे सरकार स्थापन झाले आहे, तर भारत सरकारने तेथे जाऊन अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा ठामपणे मांडला पाहिजे आणि तिथला तणाव संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” RSS च्या फंडिंगवर प्रश्नचिन्ह – कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) केलेल्या टीकेचेही सिंह यांनी समर्थन केले. संघाची नोंदणी आणि फंडिंगबाबत खर्गे यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. “RSS दीर्घकाळापासून नोंदणीकृत नाही, हे सत्य आहे. निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bonds) बाबतीतही मोठा गैरव्यवहार झाला आहे, ज्यामुळे एका विशिष्ट पक्षाला अवाजवी फायदा मिळाला आणि निवडणुकीतील समान संधी नष्ट झाली,” असा आरोप सिंह यांनी केला. यापूर्वी प्रियांक खर्गे यांनी भाजपला ‘सैतानाची सावली’ संबोधत संघाच्या आर्थिक पारदर्शकतेवर आणि कायदेशीर स्थितीवर प्रश्न उपस्थित केले होते. आता बांगलादेश दौऱ्याच्या निमित्ताने हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.