दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशील कुमारला ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तिहार कारागृहात कैद होता. न्यायाधीश संजीव नरुला यांनी आज सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. काय आहे नेमके प्रकरण? मालमत्तेच्या वादातून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ४ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये २३ वर्षीय सागर धनखड आणि त्याचा मित्र सोनू आणि इतर तिघांवर हल्ला केला होता. यात सागर धनखडचा मृत्यू झाला .सागर आणि त्याच्या मित्रांनी सुशील कुमारचा फ्लॅट सोडला नसल्याने वाद झाला होता. त्यातून धनखडची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समाेर आली हाेती. सुशील कुमार याने मे २०२१ मध्ये दिल्लीतील तिहार तुरुंगात शरणागती पत्करली होती. त्याच्यावर दंगल, बेकायदेशीर जमाव आणि गुन्हेगारी कट यासह ज्युनियर कुस्तीपटूचा खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुशील कुमारला धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ मध्ये कुस्तीपटू सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला यापूर्वीही एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रकरणात कुमार आणि इतर १७ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.