रवींद्र कदम
नगर -प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील मांजरसुंभा-डोंगरगण शिवरस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे चुकीचे व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. याकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करून ठेकेदाराची पाठराखण करत असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावच्या विकासात रस्त्यांची महत्त्वाची भूमिका असते. रस्ते हे गावाच्या विकासाच्या धमण्या असतात. मात्र, तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंभा या गावाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. मांजरसुंभा या गावातील डोंगरगण-मांजरसुंभा शिव रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत दैनिक प्रभातने रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पाठपुरावा केला होता. या कामाला सुरुवात ही झाली. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ते चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिले जाते. मात्र, या गावातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. काळा-मळावस्ती, गारामाथा येथे 200 ते 300 ग्रामस्थांची लोकवस्ती आहे. तसेच अनेक ग्रामस्थांचा दूध व्यवसाय आहे.
पावसाळ्यात या व्यावसायिकांना डोक्यावर दुधाचे कॅन घेवून पायपीट करावी लागत असे. काळी माती असल्याने पावसाळ्यात रस्त्या चिखलमय झाल्याने अनेक ग्रामस्थ घसरून पडलेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिव रस्त्याचे 1.5 कि.मी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी आला आहे. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीने रस्त्याचे काम चुकीच्या व निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. या अशा कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.