कार्यकाळ संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्याकडे कल
जाधववाडी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत. त्यामुळे सध्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपआपल्या प्रभागात विकासाची गंगा कशी येईल यासाठी प्रयत्न सुरू केले असून, विकासकामे करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातून आपण जनतेच्या हिताचे काम कसे करतो आणि आपल्याशिवाय विकास होऊच शकणार नाही, अशी भावना सध्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या चाहत्यावर्गात दिसून येत आहे.
एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात विकासकामे होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण पुढील वर्षी वॉर्डनिहाय निवडणूक होणार आहे. परंतु ते वॉर्डची रचना कशी असणार याबाबत निश्चित रूपरेषा तयार नाही. त्यामुळे प्रभागात विकास करताना नगरसेवक स्वतः जातीने हजर राहत असून, संबंधित परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वास नागरिकांना देत आहेत. त्यांचे कार्यकर्ते प्रभागात झालेल्या कामांची सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल करत आहेत. तसेच विकासकामे होण्यापूर्वीची स्थिती व नंतरची परिस्थिती याचे फोटो व्हॉट्सऍप ग्रुप, फेसबूक व सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
आपल्या प्रभागात विकासकामे सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदी व समाधानाचे वातावरण आहे. परंतु मागील चार वर्षे लोकप्रतिनिधींना शोधण्यासाठी कार्यालयात गेले तरी भेटत नव्हते. परंतु जशी निवडणुकीचा कार्यकाळ जवळ येत आहे तसे लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागाकडे लक्ष देताना दिसून येत आहेत. त्यामुळे मतदार व नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी काय भावना आहे किंवा खरोखरच लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे कार्य करत आहेत की लोकांच्या भावनांशी खेळत आहेत याचा निकाल निवडणुकीनंतरच लागेल.
सध्या प्रभागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधींसह इच्छुकांनीही आपल्या परिसरातील नागरिकांच्या कामास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. परंतु यातील कोणाला संधी द्यायची की कोणाला घरी बसवायचे हे सुज्ञ जनताच ठरवेल.
सध्याचा मतदार सुज्ञ, सुशिक्षित व विचारी असून तोच आपले मत स्वतः ठरवेल. कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही. त्यामुळे जनतेच्या हिताचे अविरत कार्य करणाऱ्याच व्यक्तीला निवडून देईल यात शंका नाही. लोकप्रतिनिधींनी जनसेवेकरिता कंबर कसली असली तरीही मतदारांनी देखील आपल्या भरवशाचा व काम करणाराच लोकप्रतिनिधी निवडावा, असे मत जानकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.