नवी दिल्ली : पालघरमधील साधूंच्या हत्येवरून राजकारण करणारे आता बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबाबत गप्प का? असा सवाल कॉंग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे. तसेच इतर ठिकाणी अशा घटना झाली तर तो गुन्हा आणि भाजपशासित प्रदेशात अशा घटना झाल्या तर तो गुन्हा नाही, असे भाजपचे वर्तन असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हुसेन दलवाई म्हणाले, पालघरमधील साधूंची हत्या ही मॉब लिंचिंग नाही. भाजपने आधी मुस्लिमांवर साधूंच्या हत्येचा आरोप करत संशयाचं वातावरण तयार केले. मात्र, पालघर हत्येमध्ये मुस्लीम सापडले नाहीत. त्यामुळे आता भाजप ख्रिश्चनांवर आरोप करत आहे. पालघरमध्ये भाजपचा सरपंच आणि पदाधिकारी आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी भाजपचे कार्यकर्ते निघाले आहेत. भाजप धर्माचं आणि जातीचं राजकारण करत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
बुलंद शहरामधील घटनेवर सर्व गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आपल्या सोयीचे राजकारण करत आहे. बुलंदशहरामधील घटना एका व्यक्तीने घडवून आणली नाही, तर यामागे अनेक व्यक्तींचा हात आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा अनेक घटना घडल्या. त्यावर भाजप काहीही बोलत नाही. भाजप आपल्याकडील घटना दाबून दुसऱ्या घटनांकडे बोट दाखवत आहे. बुलंदशहरामधील घटना एका व्यक्तीने केली नाही. यामागे बड्या लोकांचा समावेश आहे. या घटनेचा तपास व्हायला हवा, अशी मागणी देखील दलवाई यांनी केली.