– जिल्हा प्रतिनिधी
पुणे -जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या व गावकी भावकीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या अशा ग्रामपंचायतींसाठी आज (रविवारी)अत्यंत चुरशीने सरासरी सुमारे 80.79 टक्के असे विक्रमी मतदान झाले. जिल्ह्यात जाहीर झालेल्या 221 पैकी 27 ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि 49 गावचे सरपंच यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 176 ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्यांसाठी, 18 ग्रामपंचायतींच्या अंशतः जागांसाठी आणि 167 गावांचे सरपंचपदासाठी उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी मंगळवारी (20 डिसेंबर) होणार असून, त्याच दिवशी नवे गावकारभारी ठरणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित 12 तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक 54 ग्रामपंचायती या भोर तालुक्यातील आहेत. या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश नाही. उर्वरित 11 तालुक्यांपैकी भोरपाठोपाठ वेल्हे तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये चुरशीच्या ठरणाऱ्या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, चांडोली बुद्रुक, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी; विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामतीतील लोणी भापकर,
मोरगाव, पणदरे, वागजवाडी यांसह हर्णस, कर्नावड, कारी, शिरवली तर्फे भोर, वेळवंड, हातनोशी, साळुंगण (ता. भोर), दापोडी, बोरीभडक, दहिटणे (ता. दौंड), पिंपरी सांडस, कदमवाकवस्ती, पेरणे, आव्हाळवाडी, गोगलवाडी (ता. हवेली), मदनवाडी, लाखेवाडी, डाळज नं. 2, बिजवडी, कळशी, कुरवली, रेडणी, सराटी (ता. इंदापूर), साकोरी तर्फे बेल्हे, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), चास, बहुळ, मांजरेवाडी, शिरोली, शेलगाव (ता. खेड), वरसोली, गोडुंब्रे, शिरगाव (ता. मावळ), आडमाळ, मोसे खुर्द, पाथरशेत, कोंढूर (ता. मुळशी), मांडवगण फराटा, करंजावणे (ता. शिरूर) आणि दापोडे, धानेप, कोशिमघर, शिरकोली, वाजेघर बुद्रूक (ता. वेल्हे) या गावांमधून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरपंचपदाच्या उमेदवारांचे जीवाचे रान
ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर नसल्या तरी सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी येथे आपली ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली. अनेक गावांमध्ये दुरंगी ती काही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती झाल्या. यात काही अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब पणाला लावले आहे. पाच वर्षांत एकच सरपंच राहणार असला तरी पहिली उपरपंचपदाची संधी तुम्हालाच अशी प्रलोभने दाखवून सरपंचपदासाठी मतदान आपल्या पारड्यात पाडून घेतले.
गावकीसाठी होऊद्या खर्च…
सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत असल्याने यावेळी खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. निवडणूक आयोगानेही वाढत्या खर्चाला मंजूरी दिली असली तरी आयोगच्या मर्यादेत निवडणूक लढवणे कठीए आहे. रोजच्या जेवणावळी, सोशल मीडिया, कार्यकत्यांचा लवाजमा, बाहेरगावच्या मतदारांना गावाकडे आणणे, यामध्ये सरपंचपदाच्या उमेदवाराचा मोठा खर्च झाला. याशिवाय काही वॉर्डांमध्ये सदस्यांचा खर्च देखील या उमेदवारांना करावा लागल्याची परिस्थिती पाहायला मिळाली.