अकोले -करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी आयटीआय मधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य संजय बोरस्ते यांनी दिली.
बिहार व केरळमधील खासगी आयटीआय संघटनेने केंद्राकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा केंद्राने बिहार राज्य सरकारला अहवाल देण्याबाबत सूचना केली आहे. त्या अहवालाच्या आधारे केंद्र व राज्य सरकार एकूण फीच्या 50 टक्के रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्याच्या विचारात आहे.
महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे अशा आर्थिक पॅकेजची मागणी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे .याबाबत त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त कुशावह व संचालक दळवी यांच्याशी चर्चा केली. तसेच या खासगी आयटीआयच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. केंद्राने डीजीइटी च्या नियमानुसार 2/3 इतका वेतन निधी दिला तरी देशात मुलांना त्याचा फायदा होईल. उर्वरित रक्कम राज्य सरकारने त्यांच्या आर्थिक बजेट मधून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.