प्रसाद पाटील
जर दक्षिणेकडील राज्ये काही निसर्गपूरक गोष्टी करू शकतात, तर उत्तरेकडील राज्येही त्यांचे अनुकरण करू शकतात.
जागतिक वायू गुणवत्तेच्या 2021 च्या अहवालात भारतातील 35 सर्वांत कमी प्रदूषित शहरांपैकी 30 शहरे कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या चार दक्षिणेकडील राज्यांमधील आहेत, हे आश्चर्यचकित करणारे वाटू शकते; परंतु उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि हरियाणा या उत्तरेकडील राज्यांच्या दृष्टिकोनातून या अहवालाकडे पाहिल्यास ते एक कटू सत्य आहे, हे पटते. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीने प्रदूषणात सर्वांना मागे टाकले आहे. अहवालानुसार, कोची, चेन्नई, अमरावती आणि बेंगळुरू यांसारख्या दक्षिणेकडील शहरांमध्ये वायू प्रदूषण पातळी 40 ते 70 च्या दरम्यान आहे तर लखनौ, पाटणा, जयपूर आणि रोहतक या शहरांत ती 100 ते 170 च्या दरम्यान आहे. दिल्लीची सरासरी प्रदूषण पातळी 230 इतकी आहे.
दक्षिणेकडील राज्यांना भौगोलिकदृष्ट्याही मोठा फायदा आहे. त्यांची एक तरी सीमा सागराला जोडलेली आहे. अशा स्थितीत उपखंडाच्या सभोवतालच्या महासागरातून येणारे वारे क्षणार्धात प्रदूषकांना उडवून लावतात. त्या तुलनेत चारही सीमांना जमीन असलेल्या उत्तरेकडील राज्यांना हा फायदा मिळत नाही. धुळीने युक्त हवा या भागात अडकते आणि तिथेच फिरत राहते. त्यामुळे अधिकाधिक प्रदूषण पसरते. उन्हाळ्यात तर संपूर्ण उत्तर भारतच धुळीचे पात्र बनल्यासारखे दिसते. या कालावधीत तेथे धुळीच्या वादळांमुळे दृश्यमानता कमी होते, तर हिवाळ्यात थंड हवा, आर्द्रता आणि प्रदूषकांमध्ये मिसळते आणि दाट धुके तयार होते. त्यावेळी तर दृश्यमानता जवळजवळ शून्य होते.
उत्तर भारतात थारच्या वाळवंटातून येणारे वारे उत्तर प्रदेशातील शहरांचा जणू कब्जाच घेतात.
शिवाय, कारखाने आणि वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जनही या समस्येत भर घालते. त्याखेरीज उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सातत्याने सुरू असतात. त्यामुळे येथील वातावरण अधिकच बिघडत आहे. परंतु केवळ नैसर्गिक फायद्यांमुळे दक्षिणेकडील राज्ये कमी प्रदूषित आहेत, असे म्हणता येणार नाही. गेल्या अनेक वर्षांत तेथे या बाबतीत प्रचंड प्रगती झाली कारण तिथे त्या दृष्टीने अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये देशाच्या उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत जीवनमानाचे निदर्शक चांगले आहेत. नीती आयोगाच्या मते, मोठ्या राज्यांमध्ये केलेल्या जागतिक बॅंकेच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणने एकंदर कामगिरीच्या बाबतीत सर्व राज्यांना मागे टाकले आहे. या अभ्यासात आरोग्य सेवा, प्रशासन आणि माहितीचा समावेश करण्यात आला होता.
दक्षिणेकडील राज्यांमधील लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत असल्याने दक्षिणेच्या तुलनेत उत्तर भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. उत्तर भारताने निश्चितपणे या लोकसंख्याशास्त्रीय लाभाचा उपयोग देशाच्या सर्वांगीण आणि जलद विकासासाठी करणे आवश्यक आहे. परंतु लोकसंख्येच्या उच्च वाढीमुळे उत्तरेकडील राज्यांवरील दबाव वाढत आहे. उदाहरणार्थ, गेल्या 15 वर्षांत बिहारची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त होऊ शकते. तमिळनाडूपेक्षाही राजस्थान हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. साहजिकच उत्तरेत लोकसंख्येचा स्फोट होत असताना दक्षिणेत लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी होत आहे. त्याचा वायू प्रदूषणाच्या पातळीवर
निःसंशयपणे परिणाम होतो.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 2013 मध्ये जगभरात 5.5 दशलक्ष अकाली मृत्यूंचे कारण वायू प्रदूषण हे होते. वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर, विशेषतः श्वसन प्रणाली आणि हृदयावर गंभीर परिणाम होतात, हे आता सर्वज्ञात आहे. याव्यतिरिक्त प्रदूषणामुळे पिकांचे उत्पादन, जैवविविधता आणि परिसंस्थेवरही सखोल परिणाम होतो. वायू प्रदूषणाचे आणखी एक कारण म्हणजे वाढते शहरीकरण. तमिळनाडू आणि केरळ ही राज्ये भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी आहेत. राज्याची लोकसंख्या स्थूलमानाने ग्रामीण आणि शहरी अशा भागांत विभागलेली आहे. ग्रामीण भागांतही पुरेशा आरोग्य सुविधा आणि नागरी प्रशासन दिसून येते.
कमी-अधिक प्रमाणात हीच गोष्ट केरळ आणि कर्नाटकची आहे. याउलट, उत्तर प्रदेशचा 22 टक्के हिस्सा शहरी आहे. तसे पाहायला गेल्यास ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात अव्वल आहे. थंडीच्या काळात उत्तर भारतातील वायू प्रदूषणाची स्थिती अधिकच बिकट होते. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रदूषणाची परिस्थिती जशी सामान्यतः मध्यम किंवा चांगली असते तशी ती उत्तरेकडे कधीच सामान्य नसते. अगदी चांगल्यात चांगल्या काळातसुद्धा दिल्लीसारख्या शहरांमधील वायू प्रदूषण निर्देशांक स्वीकार्य पातळीपेक्षा तिप्पट आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे पीएम 2.5 ची पातळी 1000 च्या पुढे जाते. याउलट तमिळनाडूसारख्या राज्यांत लोक सणासुदीच्या वेळी त्यांच्या गावी परतून निसर्ग आणि हवामानाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात, हे दिसून येते.
पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पीक घेतल्यानंतर त्याचे अवशेष शेतातच जाळून टाकत असल्याने दिल्लीत वायू प्रदूषणात वाढ होते. वातावरणात अडकलेला धूर राजधानी आणि इतर शहरांच्या दिशेने पूर्वेकडे सरकतो. त्यामुळे तेथे धुराची काळी चादर पसरलेली दिसते. यासंदर्भात अनेक अभ्यास झाले असून, त्यावरून असे दिसून येते की, वायू प्रदूषणामुळे आयुर्मान कमी होते. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास वायू प्रदूषणाच्या अस्वीकार्य पातळीकडे पाहता स्वच्छ हवामानाबद्दल सामान्य लोकांच्या मनात जागरूकता वाढविण्याची गरज आहे. औद्योगिक कारखान्यांना दाट लोकवस्तीपासून दूर ठेवणे, बांधकामादरम्यान प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणे आणि शहरी भागात वृक्षराजी वाढविणे या उपाययोजना तातडीने केल्याखेरीज प्रदूषण कमी होणार नाही.