राहूल गोखले
मनसेची स्थापना होऊन चौदा वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात मनसेने चढ-उतार पाहिले; त्यात अस्वाभाविक काही नाही. पण हेही खरे की मनसेने आपल्याविषयी एकेकाळी जी आश्वासकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; त्याला नंतर ओहोटी लागली. या ओहोटीचे कारण शोधणे ही मनसेची प्राथमिकता असली पाहिजे. झेंडा बदलला म्हणून ओहोटीचे रूपांतर आपोआप उत्कर्षात होणार नाही.
एखाद्या राजकीय पक्षाने आपला झेंडा बदलण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. जनसंघाने आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नव्या अवतारात झेंडा आणि नाव दोन्ही बदलले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणारा हा झेंडा असणार आहे. हा झेंडा आपल्या मनात पहिल्यापासून होता, असे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसे ते असेलही आणि त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. प्रश्न झेंडा बदलावा की नाही हा नाहीच. राजकीय पक्षाने आपल्याला जे उचित वाटेल ते अवश्य करावे. प्रश्न आहे केवळ झेंडा बदलून पक्षाची प्रतिमा बदलता येईल का आणि पक्षाचा विस्तार करता येईल का हा.
राज ठाकरे शिवसेनेत राहिले असते तर मनसे स्थापन करण्याची वेळ आलीच नसती. परंतु शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा उदय होत गेला तशी राज ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा अधिकच उफाळून येऊ लागली आणि अखेर शिवसेनेच्या आवाक्यात ती बंदिस्त ठेवणे शक्य राहिले नाही. वस्तुतः बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातासमोर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्षाच्या रूपात उभे केलेले आव्हान म्हणजे मोठे पाऊल होते. एरवी शिवसेनेतून कोणी बाहेर पडले तर शिवसैनिक त्यास कसा टोकाचा प्रतिकार करीत असत हे त्यापूर्वी अनेकदा दिसून आले होते. मात्र, ठाकरे कुटुंबातीलच आणि मुख्य म्हणजे बाळासाहेब यांचे संभाव्य राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते अशा राज ठाकरे यांनीच बंड केल्यावर बहुधा शिवसैनिक देखील गोंधळून गेले असावेत आणि कदाचित मोठ्या वर्गाला राज ठाकरे हे शिवसेनेसमोर खरेच आव्हान उभे करतील अशी आशाही वाटत असावी. राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली, व्यंगचित्रकार म्हणून असणारी प्रतिभा हे सगळे बाळासाहेबांच्या जवळ जाणारे होते. त्यामुळे राज ठाकरे यांना सुरुवातीला मोठा पाठिंबादेखील मिळाला. याला आणखी एक कारण होते नि ते म्हणजे मनसेचा चेहरा हा शिवसेनेच्या धाटणीचा होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे अस्सल शिवसेनेची जी आक्रमक प्रतिमा होती, त्या प्रतिमेला छेद देणारे नेतृत्व होते. साहजिकच ती जी आक्रमकतेची पोकळी निर्माण होऊ पाहात होती तीत मनसे स्वतःला बसवू पाहात होती. मनसे पद्धतीची आंदोलने त्या पक्षाने सुरू केली आणि मराठीचा मुद्दा उचलून धरला. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे प्रवास केला होता आणि मराठीचे कैवारी म्हणून राजकीय पक्षाची जी गरज होती ती मनसे पूर्ण करू पाहात होती.
राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व मनसेच्या प्रारंभीच्या काळात उपयुक्त ठरले. त्यामुळे मनसेला मोठे समर्थन देखील मिळू लागले आणि महानगरपालिकांपासून विधानसभेपर्यंत मनसेने आपले अस्तित्व सिद्ध केले. तथापि, प्रारंभीच्या काळात जनतेत नव्या पक्षाबद्दल किंवा नव्या नेतृत्वाविषयी जे आकर्षण असते त्यास मर्यादा असतात. सुरुवातीचा भरभराटीचा काळ ओसरला की कामगिरीची नोंद घेणे सुरू होते आणि मनसेने तेथेच आपला संकोच होताना पाहिला. विकासाचा ब्ल्यूप्रिंट येथपासून गुजरात मॉडेलचे भरभरून कौतुक येथपर्यंत राज ठाकरे यांनी अनेक प्रयोग केले. परंतु त्यात एक तर सातत्य नव्हते आणि पक्ष हा रोज चालवावा लागतो; सोयीने किंवा सवडीने नाही याची जाणीवही ठेवावी लागते. वक्तृत्व किंवा काही आक्रमक आंदोलने यातून पक्ष उभा राहू शकत नाही. त्यासाठी संघटन लागते आणि त्यासाठी पक्षाला कार्यक्रम, धोरणे, तत्त्व लागतात. मनसेने यावरच नेमके काही काम केले नाही. राज ठाकरे यांचे नेतृत्व सुरुवातीला जनतेला आश्वासक वाटू लागले होते हे खरेच; मात्र नेतृत्वही संघटनेशिवाय अधुरे असते.
मनसेने याचे भान राखले नाही. एकेकाळी मोदींची भरभरून स्तुती येथपासून सुरू झालेली वाटचाल मोदींवर टोकाची टीका करण्यापर्यंत पोहोचली. जेथे मनसेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला होता तेथे मनसेने आपल्या ब्ल्यूप्रिंटमधील काय नेमके प्रत्यक्षात उतरविले हा संशोधनाचा विषय. त्यातच मनसेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मनसेतून अन्य पक्षांत जायला लागले. हे सुचिन्ह नसते. जेव्हा पक्षात राहून काहीही उपयोग नाही ही भावना बळावते तेव्हा असा असंतोष निर्माण होतो आणि पक्षातून गळती सुरू होते. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यावर अगोदर गोंधळाचे वातावरण; नंतर लोकसभा निवडणूक लढविणार नाही हा निर्णय; मग विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करणार की स्वबळावर लढणार यावर काथ्याकूट; निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून येणे, आता भाजपशी सलगीच्या चर्चा हे सगळे एकूणच सातत्यहीनतेचे दर्शन घडविते. ज्या मोदींवर वर्षही उलटले नसलेल्या लोकसभा निवडणुकीत सडकून टीका केली त्यांच्याच भाजपशी सलगीची वृत्ते पसरत आहे हा तर मोठा विरोधाभास.
राजकारणात कोणीही कायमचे शत्रू किंवा मित्र नसते हे कितीही ग्राह्य धरले तरी अशी सातत्यहीनता मनसेसारख्या पक्षाला परवडणारी नाही. वस्तुतः या सगळ्यावर मनसे आणि राज ठाकरे यांनी चिंतन करणे आवश्यक होते आणि आहे. केवळ धक्कादायक विधाने आणि कृती याने काही काळ प्रकाशझोत मिळतोही; पण त्यात कायमस्वरूपी लाभ नाही.
शिवसेनेने किती वर्षे जनतेत उतरून कामे केली तेव्हा सत्तेपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली हे राज ठाकरे यांनी जवळून पाहिले असणारच. तेव्हा जनतेत राहून काम आणि त्यासाठी प्रबळ संघटन हाच यशाचा मार्ग असतो आणि त्यासाठी खूप मेहनत लागते. अधूनमधून पक्ष चालवता येत नसतो आणि तो तसा चालविला की जनता देखील अशा पक्षाला गांभीर्याने घेत नाही. मनसेने यावर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. झेंडा बदलून आपण आता हिंदुत्वाचा कैवारी पक्ष म्हणून स्वतःस सिद्ध करू आणि शिवसेनेने महाआघाडीत समाविष्ट होऊन हिंदुत्वाचा जो पैस रिकामा केला आहे तो आपण भरून काढू असा जर मनसेचा होरा असेल तर तो अल्पसंतुष्टतेवर आधारित आहे असेच म्हटले पाहिजे. पक्षाची आणि नेतृत्वाची प्रतिमा ही अशा झेंडा बदलांनी सिद्ध झाली असती तर मग संघटन, कार्यक्रम, धोरणे, मेहनत या सगळ्याची गरजच भासली नसती. तेव्हा मनसेने अधिक सखोल विचार करावयास हवा. झेंडा बदलून आपण पक्षात चैतन्य निर्माण करू असा राज ठाकरे यांचा अंदाज असूही शकतो. मात्र, ते चैतन्य दीर्घकाळ कसे टिकेल याचा विचार अधिक गरजेचा हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
चौदा वर्षांचा सत्तेचा वनवास संपवायचा तर तसा दिग्विजय करणे आवश्यक. तो करण्याची आपली क्षमता आहे याचे दर्शन मनसे घडविते का याचे उत्तर काळ देईलच; मात्र झेंडा बदलाच्या निमित्ताने मनसेने आपल्या कार्यपद्धतीत आणि प्रतिमेत देखील बदल घडविला तर मनसेला पुढची वाटचाल सुकर होईल.