– हेमंत देसाई
अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचे गंडस्थळ मानले गेलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल-कायदाच्या अतिरेक्यांनी विमानांच्या मदतीने 11 सप्टेंबर 2001 रोजी आत्मघातकी हल्ला केला. या घटनेस 20 वर्षे होत असून, त्यानंतर जग आमूलाग्र बदलले असले तरी ते तेव्हा इतकेच आजही अशांत आहे.
2001 मधील त्या घटनेनंतर अमेरिकेने अल-कायदाच्या तळांवर प्रतिहल्ला करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2001 हा दिवस निवडला आणि त्यानंतर जागतिक अशांतता अधिकच वाढली. 11 सप्टेंबर 2001 रोजी अतिरेक्यांनी अमेरिकेत घुसून दोन देशांतर्गत प्रवासी विमाने ताब्यात घेतली. त्या विमानांत बसून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींवर धडका दिल्या. तोपर्यंत जगाने अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाही केली नव्हती; परंतु दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या लष्करी शक्तीचे केंद्र असलेल्या पेंटॅगॉन या मुख्यालयावरही हल्ला घडवला.
अमेरिकेवरील या हल्ल्यांमध्ये हल्लेखोर अतिरेकी तर मरण पावलेच. परंतु तीन हजार लोक मृत्युमुखी पडले. ही घटना तत्काळ टेलिव्हिजनवरून दाखवण्यात येत होती आणि या टॉवर्समधून शेकडो लोक वरून खाली पडले. काहीजण लटकत होते, तर काहीजण जळून मरण पावले. या इमारतींच्या खाली असलेले शेकडो लोक भयभीत नजरांनी हे सर्व दृश्य बघत असल्याचे मी त्या दिवशी टीव्हीवर बघत होतो, हे आजही आठवते. या हल्ल्यामागे अल- कायदा ही अतिरेकी संघटना असून,
ओसामा-बिन-लादेन हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा निष्कर्ष अमेरिकेने काढला. विशेष म्हणजे, ऑगस्ट 1998 मध्ये अतिरेक्यांनी टांझानिया व केनियातील अमेरिकी वकिलातींवर तुफानी हल्ले केले होते. या हल्ल्यात 225 लोक मृत्यू पावले होते. अरब मुलखावर अमेरिकी लष्कराचा ताबा असून, अमेरिकेने इराकवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच अमेरिका इस्रायलला सातत्याने समर्थन देत असून, त्यामुळे पॅलेस्टाइन जनतेवर अन्याय होत आहे. म्हणून अमेरिकेला धडा शिकवायला पाहिजे,
असा फतवा लादेन, शेख मीर हमजा, अल जवाहिरी, अहमद ताहा या अतिरेक्यांनी 1998 साली अमेरिकेविरुद्ध जारी केला होता. खरे तर, 1980च्या दशकारंभी सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, अमेरिका व पाकिस्तानने मिळून अफगाणिस्तान व मध्यपूर्व आशियातील मुजाहिदींनीसाठी लष्करी प्रशिक्षण तळ उभारले होते. तालिबानची सुरुवात तेथूनच झाली आणि ते आज सामर्थ्यशील झाले आहेत, त्यास मूलतः अमेरिकाच जबाबदार आहे. पुढे रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर, अफगाणिस्तान हळूहळू तालिबानच्याच वर्चस्वाखाली आला.
काही काळानंतर लादेनचे अमेरिकेतील सत्ताधाऱ्यांशी संबंध बिघडत गेले. मग त्याने अमेरिकेविरुद्ध दहशतवाद्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानातील अतिरेकी तेव्हा जम्मू-काश्मीरमध्येही गडबडी करत होते. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा भारतास फटका बसत असूनही, अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. 1988-89 च्या सुमारास अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपले. सोव्हिएत रशिया विखंडित झाला.
या पार्श्वभूमीवर, 9/11ला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे रौद्ररूप जगासमोर आले. याचा बदला घेण्यासाठी, अमेरिकेने ब्रिटन व अन्य मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने 7 ऑक्टोबर 2001 रोजी ऑपरेशन “एंड्युअरिंग फ्रीडम’सुरू करून, अफगाणिस्तानवर हवाई हल्ले सुरू केले. लादेन हा अफगाणिस्तानात असून, त्याने केलेल्या हल्ल्याचा आम्ही बदला घेत आहोत, असे जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी जाहीर केले. वास्तविक लादेन, अल जवाहरी प्रभृती अतिरेक्यांना सर्जिकल स्ट्राइक करून मारणे हा उपाय होता.
पुढे अनेक वर्षांनी अमेरिकेने पाकिस्तानात पळून गेलेल्या लादेनला गुप्त कारवाई करून ठार मारले; परंतु अतिरेकी संघटनेच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करून उत्तर देताना, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक, खासकरून स्त्रिया व लहान मुले यांनाही बसणार आहे, याची अमेरिकेने पर्वाच केली नाही. या कारवाईत लाखो अफगाण नागरिक मरण पावले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. शाळा, कॉलेज, दवाखाने यांचीही राखरांगोळी झाली. अफगाणिस्तानविरोधी दहशतवादी आघाडीत जे सामील होतील, ते आमचे मित्र व बाकीचे देश मात्र दहशतवाद्यांच्या बाजूचे, असाच पवित्रा अमेरिकेने घेतला होता.
अमेरिकेने त्यावेळी तालिबानची तेथील राजवट उलथवून टाकली आणि तेथे अध्यक्ष म्हणून आपली प्यादी बसवली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नॉर्थ ऍटलॅंटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा नाटो संघटनेतील 42 देशांच्या संमिश्र फौजा अफगाणिस्तानात तैनात करण्यात आल्या. 2004 साली तेथे निवडणुका होऊन, अमेरिकापुरस्कृत हमीद करझाई यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अमेरिकेने पाकिस्तानची बळेबळेच मदत घेतली. वास्तविक अफगाणिस्तानमधील तालिबान आणि पाकिस्तान यांचे घनिष्ठ संबंध होते.
मात्र अमेरिकेने दम दिल्यानंतर, पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवादविरोधी आघाडीत समील व्हावे लागले. पुढे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनांवर अमेरिकेच्या प्रयत्नांनंतर यूनोने बंदी घातली. मात्र, अतिरेक्यांच्या विरोधात आघाडी उघडण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने लादेनला आश्रय
दिला होता. मुल्ला ओमरलाही पाकची सर्व प्रकारची मदत होत होती. भारतात आम्ही जिहादींना पाठवत होतो आणि आमच्या दृष्टीने ते स्वातंत्र्ययोद्धे होते, असे मुशर्रफ यांनी जाहीरच करून टाकले होते. आज अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली असून, अमेरिकेचा तिथे सपशेल पराभव झाला आहे.
9/11च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा वचपा काढल्यानंतरही पुन्हा तालिबानचे भूत अफगाणिस्तानवर स्वार झाले आहे. आता तर 9/11चा हल्ला हा लादेनने केलाच नव्हता, असा दावा तालिबानने केला आहे. जगातील सुडाचे राजकारण अद्याप समाप्त झालेले नाही.