मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. तसेच साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा आहे. यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
भारत-चीन तणावावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. त्याला आठवलेंनी उत्तर दिले. रामदास आठवले म्हणाले, देशातील सद्यपरिस्थितीत सर्व पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहायला हवे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. निवडणूक आल्यावर सरकारने अथवा मोदींनी आपले जवान शहीद केले असे म्हणणे चुकीचे आहे. आपला भारत आता 1962चा भारत राहिला नाही हे चीनने लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कुरकुर नाही तर कुरबूर आहे. विखे-पाटलांना मी ओळखतो त्यांच्याबद्दल भाजपमध्ये अस्वस्थ आहेत असं बोलणं चुकीचे आहे, असेही आठवलेंनी नमूद केले. राज्यातील निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. कॉंग्रेसला सातत्याने अपमान सहन करावा लागत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. कॉंग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे हे विसरु नये. कॉंग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार पडेल, असे आठवलेंनी सांगितले.